Friday, February 22, 2019

आपल्याकडे शेळ्यांमध्ये क्रॉस ब्रीडिंग आवश्यक आहे का?:-

१) क्रॉस ब्रीडिंग साठी शेळ्यांच्या दोन शुद्ध जाती आवश्यक असतात. त्यापैकी एक जात शेळ्यांची उदा स्थानिक किंवा उस्मानाबाद आणि दुसरी बोकडाची उदा बोअर, सिरोही, दमस्कस इ.
२) क्रॉस ब्रीडिंग केल्यानंतर जी पहिली पिढी तयार होते तिला F1 जेनरेशन असे म्हणतात. जर या f1 जेनेरेशन कडून आपणास मांस उत्पादन मिळवायचे असेल तर आपणास एकाच वेळी तीन जाती संभाळाव्या लागतील.
३) पहिल्या दोन जाती f1 जात तयार करण्यासाठी आणि आणि f1 जात व्यावसायिक उत्पादनासाठी सांभाळावी लागेल. F1 जातीपासून ज्या पाठी तयार होतील त्या शेळी म्हणून तुम्हाला ठेवता येणार नाही म्हणजे f1 पासून जी काही प्रजोत्पत्ती मिळेल ती सर्वांच्या सर्व विकावी लागेल.
४) f1 ला बॅक क्रॉस चालत नाही, देशी जातीचा बॅक क्रॉस केल्यास f1 ची उत्पादन क्षमता कमी होते. हे समजून घेण्यासाठी hf गाईंचे उदाहरण घेता येईल. देशी गाईला शुद्ध hf चे सिमेन भरल्यानंतर जी f 1 पिढी तयार होईल तिला आपण पुन्हा शुद्ध hf चे सिमेन भरतो. देशी जातीचे सिमेन भरत नाही. म्हणून शेळ्यांच्या f1 पिढीला पुन्हा बोअर ,सिरोही दमस्कस वापरावा लागेल.
५) क्रॉस ब्रीडिंग केल्यानंतर उत्पादन घेण्याचे दोन पर्याय आहेत. पहिल्या पर्यायाची वरती चर्चा केली आहे. म्हणजे क्रॉस ब्रीडिंग करून f1 जात पाळायची व तिच्यापासून मिळणाऱ्या उत्पादन विकायचे.
दुसरा पर्याय म्हणजे सतत f1 जात तयार करायची आणि तयार झालेली f1 सर्वांच्या सर्व विकायची. माझ्या मते सध्या दुसरी पद्धत वापरली जात आहे.
६) जर अश्या प्रकारे क्रॉस ब्रीड केलेली f1 जात जर कोणी पाळण्यासाठी विकत घेत असेल तर ती फार मोठी चूक ठरू शकते. कारण हि f1 जात स्टेबल म्हणजे उत्पादनाच्या दृष्टीने स्थिर नसते. अश्या f1 शेळ्या घेऊन जर तुम्ही शेळी पालन करणार असाल आणि त्या शेळ्यांना भरवायला स्थानिक बोकड वापरणार असाल तर जेनेटिक शास्त्रांच्या दृष्टीने ते चुकीचे ठरेल.
७) जर आपण f1 व त्यापुढील पिढ्यांमध्ये जास्त वजन देणाऱ्या जातीचा बोकड उदा बोअर वापरत गेलो तर 6 व्या ते 7 व्या पिढीला तुमचा कळप हा बहुतांश त्या बोकडच्या (बोअर) जातीचा झालेला असतो. तेंव्हा क्रॉस ब्रीड राहत नाही व शुद्ध बोअर पण राहत नाही. शेवटच्या पिढीला बोअर (तुम्ही जो कोणता बोकड वापरता त्याची)ची अशुद्ध जात समजली जाते.
8) f1 नंतर सतत बोअर चा किंवा सिरोहिचा बोकड वापरायचा असल्यास आपल्याकडील जनुकीय वैविध्याता कमी होत जाते व शेळ्या मोठ्या प्रमाणात साथीच्या रोगांना बळी पडू शकतात. उदा दाखल ब्रॉयलर कोंबड्यांचे घेता येईल. ब्रॉयलर कोंबड्यांची सतत इन ब्रीडिंग केल्यामुळे जनुकीय विविधता कमी होते तसेच त्या जास्त उत्पादनशील बनतात. बर्ड फ्लू सारखे साथीचे रोग आल्यानंतर आपण सर्वांच्या सर्व कोंबड्या मारून टाकतो जेणेकरून तो रोग पसरू नये. त्या ऐवजी देशी व स्थानिक कोंबड्यांची जनुकीय विविधता मोठ्या प्रमाणात असल्याने सर्वांच्या सर्व कोंबड्या एकाच वेळी एकाच रोगाला बळी पडत नाहीत.
९) क्रॉस ब्रीडिंग मध्ये आपण सतत वेगवेगळ्या जातीचे बोकड लागवडीसाठी वापरत गेलो तर सरतेशेवटी आपण काय केले हे आपल्यालाच समजणार नाही. याचा अर्थ पद्धतीशीर ब्रीडिंग प्रोग्रॅम न राखल्यास सगळेच मुसळ केरात जाईल.
१०) क्रॉस ब्रीडिंग साठी जेनेटिक शास्त्राच्या सखोल ज्ञानाची आवश्यकता असते. आणि हे शास्त्र समजण्यास थोडे अवघड आहे.
११) जगामध्ये पुढारलेल्या देशात शेळ्यांमध्ये क्रॉस ब्रीडिंग करून फारच थोड्या हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या शेळ्यांच्या जाती विकसित केल्या आहेत. उदा. सानेंन वगैरे. तेंव्हा आपण यात पडून वेळ, श्रम व पैसा वाया घालवणे कितपत श्रेयस्कर आहे.
१२) नवीन जात तयार करण्यासाठी फारच किचकट ब्रीडिंग प्रोग्रॅम आखावा लागतो व असे करून नवीन जात तयार झालीच तर तिचा जीन पूल म्हणजे जनुकीय विविधता फारच कमी असल्याने ती रोगांना बळी पडण्याची शक्यता जास्त असते.
१३) चार्ल्स डार्विन यांच्या नैसर्गिक निवड या सिद्धांतानुसार क्रॉस ब्रीडिंग ने तयार झालेली नवीन जात कितपत स्वतःच टिकाव धरू शकेल हे सांगता येणे आपल्या हातात नाही.
१४) क्रॉस ब्रीडिंग हा इच्छित ध्येय उदा वजन वाढ, दुधातील वाढ, केसांच्या धाग्याची लांबी, उंचित वाढ इ कमी वेळेत साध्य करण्यासाठीचा शॉर्ट कट आहे. बहुदा निसर्गाला असे शॉर्ट कट मान्य नसतात. त्यामुळे hf क्रॉस ब्रीड गाईंचे दूध उत्पादन वाढले परंतु रोग प्रतिकार शक्ती खूप कमी झाली, टोमॅटो वांगी मिरची इ f1 जातींचे उत्पादन भरपूर वाढले परंतु चव व रोगप्रतिकार शक्ती फारच खालावली. दूध उत्पादन वाढले परंतु फॅट कमी झाली. F1 गवार 10 रु किलो तर गावरान गवार 40 रु किलो असते.
१५) शेळ्यांच्या बाबतीत देखील वजन वाढ होईल परंतु निसर्ग दुसरे काही तरी हिरावून घेईल.
१६) क्रॉस ब्रीडिंग करताना मातेचे 50 टक्के व पित्याचे 50 टक्के जाणुकांचा र्हास होतो त्यामुळे माता पित्याचे सगळे गुण अपत्यामध्ये येत नाहीत.
१७) अर्थ शास्त्राच्या दृष्टीने मानवी जीवन जगण्यासाठी आवश्यक वस्तूंचे 3 भाग पडतात. जीवनावश्यक वस्तू, मजेत जीवन जगण्यासाठी आवश्यक वस्तू (comfortable life style) आणि आलिशान पद्धतीचे जीवन जगण्यासाठी आवश्यक वस्तू ( laxurious life style). या तीनही प्रकारासाठी चढत्या क्रमाने कर रचना करण्यात आली आहे. उदा. सायकल जीवनावश्यक वस्तू मानली तर मोटर सायकल comfortable तर कार laxurious जीवन शैली साठी आवश्यक मानावे लागेल.
मटण या दृष्टीने जीवन आवश्यक वस्तू होत नाही. ती comfortable किंवा laxurious या प्रकारात मोडेल. तेंव्हा उगीचच मटण उत्पादनात वाढ करण्यात वेळ घालवण्यापेक्षा मटणाची चव व दर्जा यांच्यात सुधारणा करणे योग्य राहील.
१८) पुढे जाऊन पुढील काही वर्षात समजा भारतात बोअर, सिरोही, बिटल इ मोजक्याच जाती शेतकरी पाळायला लागले आणि सर्व स्थानिक जाती पाळणे बंद केले तर शेळ्यांच्या बाबतीत जनुकीय दृष्ट्या भारत देशाची पुन्हा कधीही भरून न निघणारी हानी होईल.

टीप:- वरील सर्व माहिती पुस्तकी ज्ञानावर आधारित असून तिचा वापर करावयाचा असल्यास तज्ञांच्या सल्ल्याने करावा, कोणत्याही भल्या बऱ्या परिनामास लेखक या अर्थाने मी जबाबदार राहणार नाही याची कृपया नोंद घ्यावी

No comments:

Post a Comment