Sunday, February 24, 2019

बंदिस्त शेळी पालन सुरु करून मला येत्या जूनला 2 वर्षे होतील, आत्ताचा व त्या पूर्वीच्या अनुभवावरून मी माझी मते मांडत आहे, 17 मार्च 2017.:-

मोठ्या शेळ्यांपासून सुरवात-
1) 3 ऐक महिन्याच्या गाभण शेळ्या खरेदी केल्यास पुढील 8 ऐक महिन्यात उत्पादन व उत्पन्न हाती येते. जर चांगले उत्पन्न मिळाले तर शेळीपालकाचा उत्साह वाढतो, आणि याच्या उलटेही होऊ शकते.
2) मोठ्या परंतु गाभण नसलेल्या शेळ्या खरेदी करण्यात काहीच अर्थ नाही, त्यापेक्षा पाठी खरेदी केलेल्या बऱ्या. अश्या मोठ्या शेळ्यांमध्ये फक्त 8-12 महिने वाचतील.
3) भरपूर चांगला चारा, खुराक व योग्य निवारा असल्यास मोठ्या व गाभण शेळ्या लवकर सेट होतात, त्यामुळे अडचणी कमी होऊन उत्पन्न लवकर सुरु होते. काही शेळ्या मात्र होत नाहीत. त्या काढून टाकाव्या लागतात.
4) मोठ्या शेळ्या पहिल्या वर्षी खराब होण्याच्या अनेक कारणांपैकी प्रमुख कारण म्हणजे नवीन शेळी पालकास व्यवस्थापन न जमणे हे होय. 
5) माझा अनुभव येथे मी नमूद करतो. मी आमच्या मेंढरांतील 22 शेळ्या ज्या स्थलांतरित,मुक्त पद्धतीने पाळत होतो त्या बंदिस्त केल्यानंतर पहिले 4 ते 5 महिने व्यवस्थित होत्या (वजनात थोडी घट झाली होती). कारण तेंव्हा मुबलक चारा व चांगला खुराक देत होतो. त्यानंतर दुष्काळामुळे चाऱ्याची आबाळ व अर्थिक अडचणींमुळे खुराक घालणे बंद केल्याने शेळ्यांची वजने 10-12 किलोपर्यंत कमी झाली. त्याचे दुष्परिणाम मला या वर्षी भोगावे लागले.
6) मोठ्या शेळ्या, मोकाट चराऊ सवय असलेल्या शेळ्या जेंव्हा आपण बंदिस्त करतो तेंव्हा बहुदा त्यांना पोट भरल्याचे समाधान मिळत नसावे कारण माझ्या मते मोकाट पद्धतीत त्या 5 किलो पेक्षा खूप जास्त चारा खात असाव्यात. त्यामुळेच बहुदा त्यांना खुराक न देता त्यांचे पासून चांगले उत्पादन मिळते. 7) मोकाट चराऊ शेळ्या चाऱ्याच्या बाबतीत खूपच चोखंदळ असतात. हि त्यांची सवय कित्येक दिवस (2-3 वर्ष) किंवा काहींच्या बाबतीत कधीच मोडली जात नाही असे वाटते. खरे तर त्यामुळेच फिरत्या शेळ्या खराब होतात. शेतकऱ्यांकडे ज्या एक दोन शेळ्या असतात किंवा खुरपायला जाणाऱ्या बायांच्या पाठीमागे ज्या एक दोन शेळ्या असतात त्या तितक्या चोखंदळ नसाव्यात असे वाटते.
8) चांगल्या जातिवंत मोठ्या व गाभण्या शेळ्या कोणी विकत नाही त्यामुळे आपण खरेदी केलेल्या शेळ्यापैकी बऱ्याच शेळ्या कमी प्रतीच्या असू शकतात किंवा त्याची कोणतीच खात्री देता येत नाही. ओघानेच कमी उत्पादन मिळते.
९) मोठ्या शेळ्या रु 8 हजार या किमतीने खरेदी केल्या व 2 वितानंतर विकायच्या ठरल्यास त्यांना 4-6 हजार एवढीच किंमत मिळते. कारण आपण खराब शेळ्या विक्रीला काढतो, ज्या घेताना खराब नसतात. 4-6 हजाराला विकल्यानंतर आपणास त्या शेळीपासुन काहीच नफा राहत नाही. त्याचे कारण असे कि विकायला काढलेली शेळी हि सतत गभडत असते, किंवा तिची करडे जगत नसतात किंवा तिला दोन करडे होत नसतात किंवा ती सतत आजारी पडते. तिला जेवढा वेळ आपण सांभाळतो तेवढा आपला तोटाच असतो. आपण खरेदी केलेल्या शेळ्यांपैकी किति शेळ्या खराब लागतात त्यावर आपला व्यवसाय नफ्यात कि तोट्यात ते ठरते.
10) हे सर्व विवेचन कटिंग साठी पाळतो त्या शेळ्यांसाठी आहे.
11) डॉ मार्केण्डेय यांनी म्हशींच्या बाबतीत एका लेखात सांगितले आहे कि ' 10 लिटर दूध देणारी म्हैस हि चांगल्या व्यस्थापणामुळे 9.5 लिटर तर अर्धा लिटर अनुवांशिक गुणधर्मामुळे दूध देते.' 
12) शेळ्यांच्या बाबतीत असे होताना दिसत नाही. एकाच व्यवस्थापनातील शेळ्यांचे विल्यानंतर तीन महिन्यातील मांस उत्पादन हे 5 किलोपासून 30 किलोपर्यंत होते. एवढा फरक पडतो.
याचा अर्थ जातिवंत शेळ्या मिळत नाहीत, जनुकीय दृष्टया होमोजिनियस शेळ्या मिळत नाहीत. परिणामी मी माझ्या कळपातील (घरच्या शेळ्या असूनही) 22 पैकी ७ शेळ्या विकून टाकल्या. अजूनही 2-4 शेळ्या मला विकाव्या लागतील. उर्वरित शेळ्यांची वजने पूर्वीसारखी झाली आहेत व आज सर्व शेळ्या तब्यतीने बऱ्या दिसतात. आता बंदिस्त पद्धतीत आर्थिक नफा किती होतो हे पाहणे बाकी आहे.
13) मोठ्या व गाभण शेळ्यांपासून सुरवात केल्यास पाठीची निवड करून घरच्या चांगल्या पाठी लवकर ठेवता येतात. यात अडचण अशी कि गाभण शेळी साठी बोकड कोणता वापरला होता ते आपल्याला माहित नसते.:
14) बऱ्याच वेळेला आपण पहिल्या किंवा दुसऱ्या वेताच्या शेळ्या खरेदी करतो. मुळात बऱ्याच शेळ्यांना पहिल्या व दुसऱ्या वेतात प्रॉब्लेम असतात. काही गभडतात, काहींना एकच करडू होते. काही करडांना स्वतःच दूध पाजत नाहीत, करडे टाकून देतात. काहींना पहिल्या वितातत दूध फुटत नाही. अनेक समस्या पहिल्या व दुसऱ्या वेतात असतात. मोठ्या शेळ्या पासून सुरवात करताना पहिल्यांदाच अश्या समस्या आल्याने शेळी पालक हैराण होतो. या समस्या पाठींपासून सुरवात केली तरी येणारच परंतु तेथे निस्तरता येते.
15) 4थ्या -5व्या विताच्या शेळ्या खरेदी करा असा सल्ला दिला तर कोणी ऐकणार नाही. 8 हजार रुपये देऊन म्हातारी शेळी खरेदी करायची का?
16) मोठ्या शेळ्या वेगवेगळ्या ठिकाणावरून खरेदी केल्यास त्या एकमेकीला मारतात. हि मारामारी कधीही बंद होत नाही. मोकाट पद्धतीत मारामारीची समस्या कमी असते कारण बंदिस्त नसल्याने मार खाणाऱ्या शेळीला मार हुकवता येतो. बंदिस्त पद्धतीत डोमीनंट शेळीचा मार खाल्याशिवाय तिला चारा खाता येत नाही. परिणामी मार खाणाऱ्या शेळ्या खराब होतात. टेलिग्राम व्हाट्स अँप वर येणाऱ्या बऱ्याच फोटो मध्ये शेळ्यांच्या गळ्यात दोरी असते किंवा शेळ्या बांधलेल्या दिसतात. या मारामारीवर काही उपाय नाही. भारतातील कोणत्याही जातीची शेळी याला अपवाद नसावी. एकाच कळपातीलया शेळ्या जरी असल्या तरी वयाने किंवा वजनाने लहान असलेल्या शेळ्याना मार खावा लागतो.
17) अनुवांशिक गुणधर्म माहित असतील व शेळ्या होमिजिनियस असतील तर फार फायदेशीर ठरेले असते.



पाठी पासून सुरवात:-
1) 3 ते 4 महिने वयाच्या पाठी 3 ते 4 हजारात मिळतात. या पाठी पासून 1-2 विते घेऊन त्या परत विकायच्या ठरल्या तरी 5-8 हजारापर्यंत विक्री होऊ शकते. त्यामुळे किमान व्यवसायात तोटा तरी होणार नाही.
2) मोठ्या शेळ्यांच्या खरेदीच्या बजेट मध्ये तेवढ्याच रकमेत दुप्पट पाठी खरेदी करता येऊ शकतात. त्यातील आवश्यक तेवढ्या ठेवून उरलेल्या 2-3 वर्षांनी विकता येऊ शकतात. 
3) 3 महिनेची पाठ साधारण 12-16 महिन्यात गाभ जाते. 12+8= 20 महिन्यात किंवा 24 महिन्यात तिच्यापासून उत्पदन मिळेल.
4) 3 महिन्याच्या पाठी खरेदी केल्या काय किंवा मोठ्या शेळ्या खरेदी केल्या काय, दोहांमध्ये मारतुकीचे प्रमाण सर्वसाधारण पणे सारखेच असते.
5) आज घडीला चांगल्या अनुवांशिक गुणधर्माचा शेळ्या मिळण्यासाठी जास्तीत जास्त संख्येचा शेळ्याच्या कळपास अनुवांशिक तेचि चाचणी लाऊन पास होणाऱ्या शेळ्या कळपात ठेवणे योग्य राहील. तेंव्हा जास्त पाठी खरेदी करून त्यांची दोन ते तीन विते पहावीत. त्यातून चांगल्या शेळ्या निवडून कळप तयार करणे योग्य राहील.
6) आज रोजी माझ्या मते चांगल्या अनुवांशिक गुणधर्माचा स्वतःचा कळप स्वतःच तयार करणे हा एकमेव पर्याय आहे.
7) वेगवेगळ्या ठिकाणच्या पाठी गोळा करून एकत्र ठेवल्यास, लहानपणापासून एकत्र असल्याने मोठे झाल्यावर मारामारीचे प्रमाण कमी राहू शकते. नुकसान टळते.
8) पाठी वाढत असताना गोठा व चाऱ्याची व्यवस्था हळू हळू करता येऊ शकते. मोठ्या शेळ्यांच्या बाबतीत सुरवातीपासूनच या बाबी आवश्यक असतात. 
9) ज्या पाठी वेगाने वाढत नाहीत त्यांना वेळीच विकून टाकता येऊ शकते.
10) 4-5 महिन्याच्या पाठिमध्ये 3 महिन्याच्या पाठी मिसळणे टाळावे. मोठ्या पाठी लहान पाठींना मारतात व त्यांची उपासमार होते. त्यामुळे शक्यतो एकदाच पाठी खरेदी कराव्यात.
11) जातिवंत शेळ्याच्या पाठी सुद्धा विक्रीला येत असतात त्यामुळे चांगल्या अनुवांशिक गुणांच्या पाठी मिळू शकतात. विचार पूस करून खरेदी करणे योग्य राहील.
12) मोठ्या शेळ्यांना आवश्यक असलेली गव्हाण पाठींना योग्य होईल असे नाही, त्यामुळे सुरवातीला पाठींसाठी गव्हाणीची वेगळी सोय करावी लागेल.
13) पहिल्या व दुसऱ्या वेतात अनेक समस्या असतात याचा मी वर उल्लेख केला आहे. (मुद्दा क्रं 14). पाठी एका वेळेला विणार नाहीत हे पहिले पाहिजे. त्यामुळे एका पाठीचे करडू दुसऱ्या पाठीला पाजता येऊ शकते. खरे उत्पन्न सुरु व्हायला 2 ते 3 वर्ष लागतील ते यामुळेच.
14) पाठी भरविण्यासाठी आपण खात्रीचा बोकड सुरवातीपासून वापरू शकतो.
15) पहिल्या वितात करडे कमी वजनाची जन्माला येऊ शकतात. तसेच मरतुक जास्त होऊ शकते. त्यामुले पहिले व दुसरे वेत परवडणार नाही. याचाच अर्थ असा कि सुरवातीचे 2 ते 2.5 वर्ष कसलेही उत्पन्न मिळण्याची खात्री देता येणार नाही. तेवढा वेळ आपण धीर धरू शकलो पाहिजे.
16) पाठी खरेदी करताना चूक झाली तर अगदी सुरवातीलाच नुकसानीला सामोरे जावे लागेल.
17) पाठी पासून मिळालेल्या पाठी ठेवण्यासाठी आपणास किमान 3.5 वर्षाचा कालावधी जाऊ द्यावा लागेल. या कळवाधीत पाठीची अनुवांशिक चाचणी पूर्ण होईल असे गृहीत धरले आहे.
18) नैसर्गिक चोखंदळ पणा कमी होऊ शकतो. त्यामुळे चाऱ्याचा अपव्यय टाळता येऊ शकतो.


--- बाळू मोटे, बारामती (9422512680)

No comments:

Post a Comment