Sunday, February 24, 2019


1

If u wright more and more personal, it becomes more and more universal. असे एक इंग्रजीत वाक्य आहे; व पु काळे यांच्या एका पुस्तकात ते दिलं होतं. इंग्रजीतच कशाला मराठीत देखील' जे पिंडी ते ब्रम्हांडी' असे आहेच कि. शेळी पालनातील असे पर्सनल अनुभव कोणी शेयर करत नाही त्या पाठीमागे अनेक कारणे असू शकतील. मी माझे 2 वर्षातील काही अनुभव येथे शेयर करण्याचा विचार केला आहे. जर मी असं म्हटलं कि मला पुरेसा अनुभव येऊदे, माझा व्यवसाय फायद्यात चालूदे आणि मग मी माझे अनुभव इतरांना सांगेन; तर तोपर्यंत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलेले असेल. तोपर्यंत माझे जसे नुकसान झाले तसे बऱ्याच जणांचे नुकसान झालेले असेल किंवा मी जसा एखाद्या समस्येवर उपाय केला तसं कोना एखाद्याला करायला तेवढाच वेळ व पैसा खर्च करावा लागेल.
चॅनेल वरील माहिती वाचून कोणी जसेच्या तसे प्रयोग करतं असं मी समजत नाही, परंतु येथील(सोसियाल मिडियावरील) माहितीमुळे निश्चित दिशा सापडायला मदत होते असं माझं मत आहे.
हे सर्व वैक्तिक अनुभव लिहित असताना बऱ्याच वेळा आत्मप्रौढीचा व आत्मवंचनेचा भाग माझ्याकडून लिहिला जाईल, त्या बद्दल मला होता होईल तेवढे माफ करावे. एखाद्या व्यक्तीची वैचारिक व तांत्रिक मर्यादा तो आत्तापर्यंत जगलेल्या जिंदगित दडलेली असते असं माझं मत आहे. एखादी गोष्ट घडली, ती का व कशी हे समजून घेण्याकरिता त्या व्यक्तीची वैक्तिक व व्यावसायिक पार्श्वभूमी समजून घेणे क्रमप्राप्त असते इथपर्यंत मी समजतो, ती गरज आहे.
एखादं पुस्तक लिहिताना त्या पुस्तकावर काम करणारे बरेच हात असतात, पैकी लेखक हि जितकी महत्वाची व्यक्ती असते तितकीच संपादक हि देखील महत्वाची असते. एखादं वैज्ञानिक पुस्तक लिहिताना त्या त्या विषयातील मार्गदर्शकाची किंवा तज्ज्ञांची मदत तो लेखक घेत असतो. येथे चॅनेल वर लिहिताना यातील काहीच घडत नाही. त्यामुळे बऱ्याच वेळा चॅनेल वरील माहिती हि सदोष असू शकते हे मी कबूल करतो. 
सोसियल मिडियावरील व या चॅनेल वरील अनेक सन्माननीय सदस्य मला नेहमी प्रोत्साहन देतात, लिहिण्यास उद्युक्त करतात, खरं तर येथील लेखनाचं अर्ध अधिक श्रेय त्यांचंच आहे. एखाद्या गोष्टीतून काही आर्थिक फायदा होत नाही अशी गोष्ट स्वतःचा वेळ खर्च करून नियमित करत राहणे हे भारतीय लोकांच्या बहुदा रक्तात नाही, मी तरी त्याला अपवाद कसा असेंन. म्हणून मी जे काही लिहितो त्याचे श्रेय वाचकांना जाते जे मला नेहमी प्रोत्साहित करतात.
चॅनेल सारखी वेगळी चूल मांडून मी लिहितो त्यात काही फायदे आहेत. येथे कोणाची दखलंदाजी नसते, लुडबुड नसते, जाहिरात नसते, कोणी लाइक केलं किंवा डिसलाईक केलं हे जाणून घेण्याची गरज नसते, सर्वात महत्वाचं म्हणजे लिहिलेली सर्व माहिती एका जागेवर सापडते. माहिती आवडली तर फॉरवर्ड करायला कोणाची परवानगी घ्यावी लागत नाही.
एक भीती आणि दुःख याचं आहे कि यातील काही अनुभव घेऊन जे मी शेळीपालकाना मोफत मिळावेत या साठी लिहिले, ते घेऊन प्रशिक्षणामध्ये सांगून त्यातून पैसे मिळवले जाऊ शकतात. अर्थात याची शक्यता जरी कमी असली तरी जी मुळात मोफत माहिती मिळाली ती तशीच पुढे मोफत जावी अशी अपेक्षा ठेवणे काही वावगे नाही.
एकूणच माझा उद्देश स्थानिक शेळ्यांच्या जातींचा कोणतीही भेसळ न होता विकास व्हावा एवढाच आहे. म्हणून हि सर्व माहिति फक्त स्थानिक जातींच्या शेळ्यांचे पालन करणाऱ्या शेळी पालकांनापर्यंत पोहचवी असं माझा प्रयत्न आहे.
--- बाळू मोटे, बारामती (9422512680)
3 ते 9 महिने वयाच्या करडांसाठी मी 2 वर्ष्याच्या अभ्यासाअंती अशी गव्हाण बनविली आहे.
यात करडांना सहज खाता येते
लेंड्या व मूत्र पडत नाही
स्वच्छता करणे सोपे आहे
एका वेळेला 8 ते 16 करडे खाऊ शकतात
झाडपाला, मका कुट्टी व खुराक खाऊ घालता येतो.
करडांना गव्हाणीत शिरता येत नाही.

कोणाला बनवून हवी असल्यास श्री महेंद्र मोरे हे फॅब्रिकेटर असून त्यांच्याशी 9970155605या क्रमांकावर संपर्क साधावा.



रेकॉर्ड ठेवण्याबाबत माझी मते:-
१) वजने घेताना शक्यतो सकाळी घ्यावीत.(अनुष्या पोटी)
२) जेवढ्या जास्त बाबींच्या नोंदी घेतल्या जातील तेवढे चांगलेच असते. परंतु सर्व नोंदी शेळी पालकास घेणे शक्य नसते म्हणून अनुवांशिक सुधारणेच्या कामी येणाऱ्या गरजेच्या नोंदी घेण्यावर जास्त भर द्यावा.
३) नोंदी एकाखाली एक या पद्धतीने घ्याव्यात व रजिस्टर मध्ये त्यासाठी तशी आखणी करावी म्हणजे अश्या नोंदी ms एक्सेल मध्ये भरणे व त्याचे विश्लेषण करणे सोईचे जाते.
४) रजिस्टर मध्ये फक्त नोंदी घ्याव्यात, त्यांचे विश्लेषण स्वतंत्र रित्या करावे. त्याच रजिस्टर मध्ये विश्लेषण करू नये.
५) अनुवांशिक नोंदणीसाठी स्वतंत्र रजिस्टर व इतर नोंदी जसे चारा, खुराक, खर्च, विक्री इ साठी वेगळे रजिस्टर ठेवावे.
६) शेळी क्रमांक ठरविताना स्वतःची वेगळी पद्धत अवलंबू शकता. उदा. 
- नुसते अनुक्रम नंबर जसे 1,2,3....
- बॅच/ वर्ष/ अनुक्रम. जसे A/2017/ 1.
- वंशावळ दिसून येईल असे, जसे
A1/AB1, A1/AB2, A1/AB3....
७) विश्लेषण करताना ठराविक पद्धत वापरावी असा काही नियम नाही, डेटा पाहून व वेगवेगळे निकष लावून विश्लेषण करता येते.
८) विलेल्या शेळीचे व तिच्या करडाचे वजन दुसऱ्या दिवशी सकाळी घ्यावे.
९) नुसत्या निरीक्षणावरून शेळीच्या अनुवांशिक गुणधर्माचा थांगपत्ता लागत नाही. वेगवेगळ्या पॅरॅमिटर च्या नोंदी असल्यास निर्णय घेणे सोपे जाते.
१०) वजने घेण्यापूर्वी दर वेळेला वजन काट्याची अचूकता तपासून घ्यावी.
--- बाळू मोटे, बारामती (9422512680)

गरज अनुवांशिक सुधारणेची:-


१) स्थानिक जातिवंत शेळ्या तसेच उस्मानाबादी या शेळ्यांच्या अनुवांशिक सुधारनेत मोठ्या संधी आहेत.

२) माझ्या तर्कांप्रमाणे विदेशी शेळ्या तसेच तत्सम इतर राज्यातील देशी शेळ्यांचे पुढील 7-8 वर्षानंतर ब्रीडिंग साठी मागणी कमी होईल व त्या वेळेला रुचकर मटणासाठी स्थानिक व उस्मानाबादी शेळीला आजच्या पेक्षा जास्त मागणी वाढेल. हि मागणी मटणासाठी तर वाढेलच परंतु ब्रीडिंग साठी सुद्धा वाढेल.
३) आज उस्मानाबादी शेळीचा ब्रीडिंग साठीचा दर रु 300 ते 350 रु किलो असल्याचे दिसते यात मोठ्या प्रमाणात वाढ होईल असे वाटते.
४) आजच्या शुद्ध समजल्या जाणाऱ्या उस्मानाबादी शेळी मध्ये निवड करून उच्च गुणवत्तेची सुधारित शेळीची जात विकसित करण्याचे काम आपणास करावे लागेल. तसेच इतर स्थानिक शेळ्यांची अनुवांशिक सुधारणा घडवून आणणे क्रमप्राप्त आहे.
५) माझ्याकडील स्थानिक शेळ्यांच्या अनुवांशिक सुधारणेचा कार्यक्रम मी आखला आहे. येत्या 8-10 वर्षात मला चांगले परिणाम मिळतील असे वाटते. आज रोजी मी मटणासाठी बोकड विक्री करत आहे. परंतु 10 वर्षानंतर मी ब्रीडिंग साठी या शेळ्या विकण्याचे नियोजन करत आहे कारण त्या वेळेला माझ्याकडे चांगल्या गुणवत्तेचे ब्रीड तयार असेल व सर्व अनुवांशिक रेकॉर्ड उपलब्ध असेल.
६) काही हुशार व चाणाक्ष शेळी पालक अगोदर पासूनच या निवड प्रक्रियेत उतरले असण्याची शक्यता जास्त आहे. आज रोजी त्यातील काही जुन्या शेळी पालकना किमान 4 ते 8 वर्ष झाली असतील. म्हणजेच त्यांचे कडील सुधारित उस्मानाबादी किंवा इतर स्थानिक शेळ्याच्या जाती योग्य वेळेला मार्केट मध्ये विक्रीस उपलब्ध होतील. हि अतिशय चांगली बाब आहे. एकूणच हा सगळा कार्यक्रम गुलदस्त्यात असतो त्यामुळे प्रत्यक्ष परिस्थिती काय आहे हे सांगणे कठीण आहे.
७) जेंव्हा विदेशी व तत्सम इतर राज्यातील देशी शेळ्यांच्या ब्रीडिंग साठी विक्रीत मंदी येईल तेंव्हा या उस्मानाबदी/ स्थानिक शेळ्यांच्या सुधारित जाती विक्रीस उपलब्ध होतील असे माझे मत आहे. त्या वेळेला नवीन शेळी पालकास चढ्या दराने या शेळ्या पाळण्यासाठी खरेदी कराव्या लागतील. 
८) तेंव्हा सर्व स्थानिक व उस्मानाबादी शेळी पालन करणाऱ्या शेळी पालकांस माझे नम्र निवेदन आहे कि त्यांनी आतापासूनच योग्य ब्रीडिंग प्रोग्रॅम आखून अनुवांशिक सुधारणा कर्यक्रम आखावा व उच्च गुणवत्तेचे ब्रीड तयार करण्यास सुरवात करावी.
९) आत्तापासूनच शेळ्यांचे पद्धतशीर रेकॉर्ड ठेवावे.
१०) अनुवांशिक सुधारणा या विषयीच्या अधिक माहितीसाठी माझ्या चॅनेल ला जॉईन व्हावे. तसेच माझी काही मदत हवी असल्यास ग्रुप वर किंवा पर्सनल चॅट वर प्रश्न विचारावेत. मी कोणी मोठा तज्ञ नसून एक सर्वसामान्य शेळी पालक आहे. माझ्या पातळीवर व उपलब्ध ज्ञानाच्या आधारे एक सामाजिक जाणीव म्हणून मी आपल्या प्रश्नांना यथाशक्ती यथोचित उत्तर देण्याचा प्रयन्त करिन. धन्यवाद.

---बाळू मोटे, बारामती (9422512680)


                                                               मका चार्यातील अन्नद्रवायचे पृथक्करण


हैड्रोपोनिक मका चारा का परवडत नाही:-

१) कोणत्याही चाऱ्याचे प्रमाण ठरवताना DM म्हणजे ड्राय मॅटर अर्थात पाणी विरहित चारा गृहीत धरून तो चारा जनावरांना (शेळ्यांना) किती द्यायचा हे ठरवतात. उदा. चिकात आलेल्या ओल्या 20 किलो मका चाऱ्यात 15 किलो पाणी असते तर 5 किलो DM असतो.
२) शेळ्यांच्या वजनाच्या 2 टक्के DM त्यांना चारा म्हणून ओल्या व सुक्या चार्यातून दिला जातो. जर 4 किलो ओला चिकात आलेला मका चारा एका शेळीला दिला तर तो 1 किलो DM होईल.
३) मका बी ज्यात 9 ते 11 टक्के पाणी असते, DM काढल्यास 1 किलो मका बी मध्ये 900ग्राम निघेल (10% ओलावा गृहीत धरल्यास)
४) 1 किलो मका बी पासून सुमारे10 किलो हैड्रोपोनिक हिरवा चारा तयार होतो असे समजू. हैड्रोपोनिक चारा तयार होताना बियातील कार्बोदकांचा ऊर्जा स्रोत म्हणून उपयोग होत असल्याने अंतिम चाऱ्यात DM कमी होतो. हि घट तूर्तास बाजूला ठेऊ.10 किलो हिरव्या चाऱ्याचा DM हा 900 ग्राम येणार. (उगवनितील घट गृहीत धरल्यास D M कमी होईल). या हिरव्या चाऱ्याचा प्रति किलो DM 90 ग्राम एवढा येईल.
५) व्हाट्स ऍप टेलेग्राम ग्रुप वरील अनेक सदस्यांच्या मते 1 किलो मका बी पासून 10 किलो चारा तयार होतो. जर 5 किलो चारा धरला तर DM वाढेल.
६) चिकात आलेल्या शेतातील एक किलो ओल्या मका चाऱ्याची किंमत हि चालू बाजारभावाप्रमाणे 1.5 ते 2.5 रु आहे. आपण येथे 2 रु प्रति किलो हा दर गृहीत धरू.
७) 1 किलो हायड्रोपोनिक मका चारा तयार करण्यासाठी 3 रु प्रति किलो असा खर्च येतो. (संदर्भ:-तामिळनाडू कृषी विद्यापीठ तसेच icar चे गोवा येथील संशोधन केंद्र)
८) वरील चित्रात शेतातील ओला मका व हैड्रोपोनिक हिरवा मका चारा यांतील अन्नद्रव त्यांच्या DM च्या आधारावर दिले आहेत.
९) एका शेळीला 4 किलो शेतातील ओला मका चारा खाऊ घातल्यास वरील चित्रात दाखवल्या प्रमाणे तिला अन्नद्रव्य मिळतील. 4 किलो हिरवा चारा म्हणजे 1किलो DM. या चाऱ्यात DM च्या 10.67 टक्के प्रोटीन असते म्हणजेच 1x10.67/100= 0.1067 किलो ( म्हणजेच 100 ग्राम) प्रोटीन शेळीला मिळेल. तसेच क्रूड फायबर चे आहे . 1x 25.92/100=0.2592 किलो क्रूड फायबर. क्रूड फायबर जितके जास्त तितकी शेळीला जास्त ऊर्जा मिळते.
10) 4 किलो शेतातील चिकात आलेल्या मका चाऱ्याची किंमत 4x2=8 रु होईल.
११) आता हेच विश्लेषण आपण हैड्रोपोनिक हिरव्या चाऱ्याचे करू. एका शेळीला 4 किलो हा चारा दिल्यास त्यात 90x4=360 ग्राम DM मिळेल. (1 किलो बी पासून 10 किलो चारा तयार होतो हे गृहीत धरले आहे). या 4 किलो चाऱ्यात 360x13.57/100= 48.85ग्राम प्रोटीन तर 360x14.07=50.65 ग्राम क्रूड फायबर मिळतील.
१२) 4 किलो हैड्रोपोनिक हिरव्या मका चाऱ्याची किंमत 3x4= 12 रु होईल.
१३) आता हे लक्षात येते कि 8 रु खर्च करून पारंपरिक पद्धतीत 4 किलो चार्यातून सुमारे 100 ग्राम प्रोटीन व 260 ग्राम क्रूड फायबर मिळतात तर 12 रु खर्च करून हैड्रोपोनिक पद्धतीत 4 किलो चार्यातून 48.85ग्राम प्रोटीन तर 50.65 ग्राम क्रूड फायबर मिळतात. 
१४) आता प्रश्न असा उरतो कि हैड्रोपोनिक मका चारा घातल्यानंतर दूध उत्पादनात किंवा शेळ्यांच्या वजनात वाढ कशी घडून येते? माझ्या मते यात प्रमुख दोन करणे आहेत.
एक म्हणजे हैड्रोपोनिक चारा घालून शेळ्यांना किंवा गाईंना नेहमी इतका खुराक तसेच पोटभर सुका चारा दिला जातो. दुसरे असे कि उत्पादन वाढ हि त्यात्या कालावधीत मोजली जाते. उदा. उन्हाळ्यामध्ये ज्या गाईन सुका चारा दिला जातो अश्या गाईंचे दूध उत्पादन समजा 7 लिटर प्रति दिवस आहे त्याच गाईंना जर हैड्रोपोनिक चारा दिला तर दूध उत्पादन 8 लिटर प्रति दिन होते. अशी तुलना केल्यामुळे फायदा दिसू शकतो. वास्तविक जेंव्हा गाईंना शेतातील ओली चिकतील मका खाऊ घालतात तेंव्हाची दूध उत्पादन व उन्हाळ्यातील फक्त हैदेओपोनिक चारा खाऊ घालून मिळणारे दूध उत्पादन यांची तुलना व्हायला हवी. अशी तुलना केल्यास दूध उत्पादनात वाढ दिसणार नाही. तसे असते तर पावसाळ्यात देखील हैड्रोपोनिक चारा खाऊ घातला असता लोकांनी. उन्हाळ्या पुरतीच त्याची उपयुक्तता मर्यादित राहिली नसती.

टीप:- वरील विश्लेषण पूर्ण पणे थेरोटीकल आहे. यातील विधाने तंतोतंत खरी ठरतील असा माझा कोणताही दावा नाही. संदर्भासाठी तामिळनाडू कृषी विद्यापीठ व गोवा येथील icar चे संशोधन केंद्रातील रिसर्च पेपर घेतले आहेत जे ओनलाईन उपलब्ध आहेत
अनुवांशिक सुधारणे साठी किमान नोंदी:-


१) निवड पद्धत, लाईन ब्रीडिंग व आऊट क्रॉसिंग साठी कळपातील शेळ्यांच्या नोंदी आवश्यक असतात.
२) जास्तीत जास्त मांस उत्पादन मिळण्यासाठी आपणास अनुवांशिक सुधारणेची गरज पडते, निवडी साठी खालील किमान बाबिंची नोंद आपणाकडे असणे जरुरीचे आहे-
*शेळी विल्यानंतरं चे वजन
* करडाचे जन्मतः, 3,6,9 महिने असतानाची वजने
* विताच्या नोंदी
* लागवडीच्या बोकडचे किमान वर्षातून एकदा वजन
* शेळी कोणत्या बोकडकडून भरविली त्याच्या नोंदी
३) वरील नोंदीचा उपयोग करून व योग्य ब्रीडिंग प्रोग्रॅम आखून अनुवांशिक सुधारणा दर वर्षी 1 ते 5 टक्के या दराने शक्य आहे.
टीप:- वरील माहिती स्वतःच्या जबाबदारीवर वापरावी हि विनंती.
बंदिस्त शेळी पालन केंव्हा परवडणार नाही:-
१) 8 महिनेच एक वेत पकडू. या 8 महिन्याचा शेळी संगोपनाचा खर्च साधारण 3 हजार रु येतो. (खरे तर जास्त येतो)
२) एक विताला 2 करडे झाली व तीन ( ते चार) महिन्यांनी त्यांना प्रत्येकी रु 3000 एवढा दर मिळाला असे गृहीत धरू.
३) एका करडाची मिळकत म्हणजे रु 3000 शेळी संगोपणावर खर्च झालेले परत मिळतील व उरलेले 3000 हजार नफा राहील.
४) आता जर शेळीला एका वितात एकच करडू झाले आणि तीन महिन्यांनी जरी ते रु 4000 ला विकले तरी हातात 1000 रु राहतील, आणि जर 3 हजरच्या खाली विकले तर तोटा होणार.
५) शेळी विल्यानंतरं 3 र्या महिन्याच्या शेवटपर्यंत लागणे व गाभण राहणे आवश्यक आहे. त्यानंतर जसे जास्त महिने लागतील तसे खालील प्रमाणे नफा कमी होत जाऊन तोटा होणे सुरु होईल
- 4 था महिना- फायदा रु 2625.(3000-375)
-5 वा महिना- फायदा रु 2250 (2625-375)
-6 वा महिना- फायदा रु 1875 (2250-375)
-7 वा महिना- फायदा रु 1500 (1875-375)
-8 वा महिना - फायदा रु 1125 (1500-375)
-9वा महिना- फायदा रु 750. (1125-375)
-10 व महिना- फायदा रु 375 (750-375)
- 11 वा महिना - फायदा रु 0. (375-375).
(येथे 375 रु प्रति महिना शेळी संगोपनाचा खर्च गृहीत धरला आहे. तसेच जो रु 3000 नफा राहतो त्यातून संगोपणावरील खर्च वजा केला आहे)
६) म्हणजे किमान 7 महिने भाकड शेळी पाळायला परवडू शकते परंतु हा काळ संपल्यानंतर तिने जुळी करडे दिली तर.
७) जर शेळी ने भाकड काळ संपून नंतरच्या वितांस एकच करडू दिले तर ती ज्या दिवशी विते त्या दिवसापासून तिला आपण तोट्यात सांभाळत आहोत असे समजायला हरकत नाही.
८) आता आपण करडांची मरतुक गृहीत धरल्यास कसा फायदा तोटा होईल ते पाहू-
समजा 10 शेळ्या आहेत. येथे प्रत्येक शेळीला जुळी करडे होणे अपेक्षित आहे. 10 शेळ्यांना 8 महिन्यात विक्रीयोग्य 20 करडे होतील. समजा मरतुक 10 टक्के धरली तर आपणास विक्रीयोग्य 18 करडे मिळतील. यातील 10 करडांचे उत्पन्न म्हणजे रु 3000x10=रु30000. हा 10 शेळ्यांच 8 महिन्यांचा खर्च असेल. आता 8 करडांचे रु 3000 ने 24000हजार मिळतील तो आपला नफा राहील.
९) शेळ्या गाभडण्याचे व मरतुकीचे प्रमाण गृहीत धरल्यास नफा आणखी कमी होईल
१०) मटणासाठी (मांस उत्पादन) शेळ्या पाळणे हाच मुख्य व शाश्वत व्यवसाय आहे. ईद साठी बोकड तयार करणे व पैदासी साठी शेळ्या व बोकड तयार करणे याला मर्यादा असून तो शाश्वत व्यवसाय होऊ शकत नाही.
११) ईद साठी बोकड तयार करावयाचे असल्यास शेळ्या पाळण्याची आवश्यकता नाही. थेट बोकड खरेदी करून ईद साठी संगोपन करणे श्रेयस्कर नाही का?
१२) पैदासी साठी जातिवंत शेळ्या तयार करण्यास सध्या वाव असला तरी भविष्यात तो स्याचुरेशन झाल्यामुळे बंद करावा किंवा कमी करावा लागणार नाही काय?
१३) शेळ्यांपासून मिळणारे उत्पन्न काढताना आपण 3 महिने वयाचे करडू व त्याचे वजन गृहीत धरतो. त्याचे कारण म्हणजे शेळी 3 महिन्यापर्यंत त्या कराडला सांभाळते, तो पर्यंत करडू सांभाळण्याचा खर्च थोडाफार असतो. 3 महिन्यानंतर करडू व शेळी वेगवेगळी होतात व तिथून पुढे करडू संगोपनाचा वेगळा खर्च आपणास करावा लागतो. म्हणजेच शेळी पासून मिळणारे खरे उत्पन्न हे 3 महिने वयाच्या कार्डापासून मिळणारे उत्पन्न होय.
१४) लेंडी खताचे उत्पन्न वेगळे मिळेल. त्याचा याच्यात विचार केला नाही. बोकडाना जास्त दर मिळतो तर पाठींना कमी त्याचा देखील येथे विचार केला नाही.

टीप:- वरील माहिती म्हणजे माझे (बाळू मोटे) अनुभव व अभ्यास असून हि मते/विचार तंतोतंत खरे ठरतात असा माझा कोणताही दावा नाही. केवळ महितीस्तव सादर आहे.

सिलेक्टिव्ह ब्रीडिंग ने दर विताला 1 ते 5 टक्के या दराने अनुवांशिक सुधारणा होईल असे सांगितले आहे. हा दर सुद्धा खूप मोठा आहे व जाणीव पूर्वक व शास्त्रीय पद्धतीने निवड पद्धत वापरली तर साधारण 6 वर्षात चांगले परिणाम दिसतील.

त्याचे कारण असे-
सुरवातीला समजा 10 किलो वजनाची करडे मिळतात.
पहिल्याए वर्षी (विताला)समजा 3% सुधारणा झाली. तर एकूण वाढ 10.3 kg मिळेल

दुसऱ्या वर्षी (विताला) पहिल्या वर्षीच्या 3%, म्हणजे 10.609 kg

तिसऱ्या वर्षी (विताला) दुसऱ्या वर्षीच्या 3% म्हणजे 10.927kg
4 थे वर्ष- 11.254
5- 11.591
6-11.938
7- 12.296
8- 12.664

असे पुढे

हि वाढ कायम स्वरूपी असणार आहे. क्रॉस ब्रीडिंग किंवा आऊट क्रॉसिंग ची कायम स्वरूपी नसते.

निवड पद्धतीने कळप होमोजिनियस होईल.
निवड पद्धतीने जुळे देण्याचे प्रमाणही वाढेल.

कळपाचा सर्वांगीण विकास फक्त निवड पद्धतीत होऊ शकतो हेच मला सांगायचे आहे.

बंदिस्त शेळी पालन सुरु करून मला येत्या जूनला 2 वर्षे होतील, आत्ताचा व त्या पूर्वीच्या अनुभवावरून मी माझी मते मांडत आहे, 17 मार्च 2017.:-

मोठ्या शेळ्यांपासून सुरवात-
1) 3 ऐक महिन्याच्या गाभण शेळ्या खरेदी केल्यास पुढील 8 ऐक महिन्यात उत्पादन व उत्पन्न हाती येते. जर चांगले उत्पन्न मिळाले तर शेळीपालकाचा उत्साह वाढतो, आणि याच्या उलटेही होऊ शकते.
2) मोठ्या परंतु गाभण नसलेल्या शेळ्या खरेदी करण्यात काहीच अर्थ नाही, त्यापेक्षा पाठी खरेदी केलेल्या बऱ्या. अश्या मोठ्या शेळ्यांमध्ये फक्त 8-12 महिने वाचतील.
3) भरपूर चांगला चारा, खुराक व योग्य निवारा असल्यास मोठ्या व गाभण शेळ्या लवकर सेट होतात, त्यामुळे अडचणी कमी होऊन उत्पन्न लवकर सुरु होते. काही शेळ्या मात्र होत नाहीत. त्या काढून टाकाव्या लागतात.
4) मोठ्या शेळ्या पहिल्या वर्षी खराब होण्याच्या अनेक कारणांपैकी प्रमुख कारण म्हणजे नवीन शेळी पालकास व्यवस्थापन न जमणे हे होय. 
5) माझा अनुभव येथे मी नमूद करतो. मी आमच्या मेंढरांतील 22 शेळ्या ज्या स्थलांतरित,मुक्त पद्धतीने पाळत होतो त्या बंदिस्त केल्यानंतर पहिले 4 ते 5 महिने व्यवस्थित होत्या (वजनात थोडी घट झाली होती). कारण तेंव्हा मुबलक चारा व चांगला खुराक देत होतो. त्यानंतर दुष्काळामुळे चाऱ्याची आबाळ व अर्थिक अडचणींमुळे खुराक घालणे बंद केल्याने शेळ्यांची वजने 10-12 किलोपर्यंत कमी झाली. त्याचे दुष्परिणाम मला या वर्षी भोगावे लागले.
6) मोठ्या शेळ्या, मोकाट चराऊ सवय असलेल्या शेळ्या जेंव्हा आपण बंदिस्त करतो तेंव्हा बहुदा त्यांना पोट भरल्याचे समाधान मिळत नसावे कारण माझ्या मते मोकाट पद्धतीत त्या 5 किलो पेक्षा खूप जास्त चारा खात असाव्यात. त्यामुळेच बहुदा त्यांना खुराक न देता त्यांचे पासून चांगले उत्पादन मिळते. 7) मोकाट चराऊ शेळ्या चाऱ्याच्या बाबतीत खूपच चोखंदळ असतात. हि त्यांची सवय कित्येक दिवस (2-3 वर्ष) किंवा काहींच्या बाबतीत कधीच मोडली जात नाही असे वाटते. खरे तर त्यामुळेच फिरत्या शेळ्या खराब होतात. शेतकऱ्यांकडे ज्या एक दोन शेळ्या असतात किंवा खुरपायला जाणाऱ्या बायांच्या पाठीमागे ज्या एक दोन शेळ्या असतात त्या तितक्या चोखंदळ नसाव्यात असे वाटते.
8) चांगल्या जातिवंत मोठ्या व गाभण्या शेळ्या कोणी विकत नाही त्यामुळे आपण खरेदी केलेल्या शेळ्यापैकी बऱ्याच शेळ्या कमी प्रतीच्या असू शकतात किंवा त्याची कोणतीच खात्री देता येत नाही. ओघानेच कमी उत्पादन मिळते.
९) मोठ्या शेळ्या रु 8 हजार या किमतीने खरेदी केल्या व 2 वितानंतर विकायच्या ठरल्यास त्यांना 4-6 हजार एवढीच किंमत मिळते. कारण आपण खराब शेळ्या विक्रीला काढतो, ज्या घेताना खराब नसतात. 4-6 हजाराला विकल्यानंतर आपणास त्या शेळीपासुन काहीच नफा राहत नाही. त्याचे कारण असे कि विकायला काढलेली शेळी हि सतत गभडत असते, किंवा तिची करडे जगत नसतात किंवा तिला दोन करडे होत नसतात किंवा ती सतत आजारी पडते. तिला जेवढा वेळ आपण सांभाळतो तेवढा आपला तोटाच असतो. आपण खरेदी केलेल्या शेळ्यांपैकी किति शेळ्या खराब लागतात त्यावर आपला व्यवसाय नफ्यात कि तोट्यात ते ठरते.
10) हे सर्व विवेचन कटिंग साठी पाळतो त्या शेळ्यांसाठी आहे.
11) डॉ मार्केण्डेय यांनी म्हशींच्या बाबतीत एका लेखात सांगितले आहे कि ' 10 लिटर दूध देणारी म्हैस हि चांगल्या व्यस्थापणामुळे 9.5 लिटर तर अर्धा लिटर अनुवांशिक गुणधर्मामुळे दूध देते.' 
12) शेळ्यांच्या बाबतीत असे होताना दिसत नाही. एकाच व्यवस्थापनातील शेळ्यांचे विल्यानंतर तीन महिन्यातील मांस उत्पादन हे 5 किलोपासून 30 किलोपर्यंत होते. एवढा फरक पडतो.
याचा अर्थ जातिवंत शेळ्या मिळत नाहीत, जनुकीय दृष्टया होमोजिनियस शेळ्या मिळत नाहीत. परिणामी मी माझ्या कळपातील (घरच्या शेळ्या असूनही) 22 पैकी ७ शेळ्या विकून टाकल्या. अजूनही 2-4 शेळ्या मला विकाव्या लागतील. उर्वरित शेळ्यांची वजने पूर्वीसारखी झाली आहेत व आज सर्व शेळ्या तब्यतीने बऱ्या दिसतात. आता बंदिस्त पद्धतीत आर्थिक नफा किती होतो हे पाहणे बाकी आहे.
13) मोठ्या व गाभण शेळ्यांपासून सुरवात केल्यास पाठीची निवड करून घरच्या चांगल्या पाठी लवकर ठेवता येतात. यात अडचण अशी कि गाभण शेळी साठी बोकड कोणता वापरला होता ते आपल्याला माहित नसते.:
14) बऱ्याच वेळेला आपण पहिल्या किंवा दुसऱ्या वेताच्या शेळ्या खरेदी करतो. मुळात बऱ्याच शेळ्यांना पहिल्या व दुसऱ्या वेतात प्रॉब्लेम असतात. काही गभडतात, काहींना एकच करडू होते. काही करडांना स्वतःच दूध पाजत नाहीत, करडे टाकून देतात. काहींना पहिल्या वितातत दूध फुटत नाही. अनेक समस्या पहिल्या व दुसऱ्या वेतात असतात. मोठ्या शेळ्या पासून सुरवात करताना पहिल्यांदाच अश्या समस्या आल्याने शेळी पालक हैराण होतो. या समस्या पाठींपासून सुरवात केली तरी येणारच परंतु तेथे निस्तरता येते.
15) 4थ्या -5व्या विताच्या शेळ्या खरेदी करा असा सल्ला दिला तर कोणी ऐकणार नाही. 8 हजार रुपये देऊन म्हातारी शेळी खरेदी करायची का?
16) मोठ्या शेळ्या वेगवेगळ्या ठिकाणावरून खरेदी केल्यास त्या एकमेकीला मारतात. हि मारामारी कधीही बंद होत नाही. मोकाट पद्धतीत मारामारीची समस्या कमी असते कारण बंदिस्त नसल्याने मार खाणाऱ्या शेळीला मार हुकवता येतो. बंदिस्त पद्धतीत डोमीनंट शेळीचा मार खाल्याशिवाय तिला चारा खाता येत नाही. परिणामी मार खाणाऱ्या शेळ्या खराब होतात. टेलिग्राम व्हाट्स अँप वर येणाऱ्या बऱ्याच फोटो मध्ये शेळ्यांच्या गळ्यात दोरी असते किंवा शेळ्या बांधलेल्या दिसतात. या मारामारीवर काही उपाय नाही. भारतातील कोणत्याही जातीची शेळी याला अपवाद नसावी. एकाच कळपातीलया शेळ्या जरी असल्या तरी वयाने किंवा वजनाने लहान असलेल्या शेळ्याना मार खावा लागतो.
17) अनुवांशिक गुणधर्म माहित असतील व शेळ्या होमिजिनियस असतील तर फार फायदेशीर ठरेले असते.



पाठी पासून सुरवात:-
1) 3 ते 4 महिने वयाच्या पाठी 3 ते 4 हजारात मिळतात. या पाठी पासून 1-2 विते घेऊन त्या परत विकायच्या ठरल्या तरी 5-8 हजारापर्यंत विक्री होऊ शकते. त्यामुळे किमान व्यवसायात तोटा तरी होणार नाही.
2) मोठ्या शेळ्यांच्या खरेदीच्या बजेट मध्ये तेवढ्याच रकमेत दुप्पट पाठी खरेदी करता येऊ शकतात. त्यातील आवश्यक तेवढ्या ठेवून उरलेल्या 2-3 वर्षांनी विकता येऊ शकतात. 
3) 3 महिनेची पाठ साधारण 12-16 महिन्यात गाभ जाते. 12+8= 20 महिन्यात किंवा 24 महिन्यात तिच्यापासून उत्पदन मिळेल.
4) 3 महिन्याच्या पाठी खरेदी केल्या काय किंवा मोठ्या शेळ्या खरेदी केल्या काय, दोहांमध्ये मारतुकीचे प्रमाण सर्वसाधारण पणे सारखेच असते.
5) आज घडीला चांगल्या अनुवांशिक गुणधर्माचा शेळ्या मिळण्यासाठी जास्तीत जास्त संख्येचा शेळ्याच्या कळपास अनुवांशिक तेचि चाचणी लाऊन पास होणाऱ्या शेळ्या कळपात ठेवणे योग्य राहील. तेंव्हा जास्त पाठी खरेदी करून त्यांची दोन ते तीन विते पहावीत. त्यातून चांगल्या शेळ्या निवडून कळप तयार करणे योग्य राहील.
6) आज रोजी माझ्या मते चांगल्या अनुवांशिक गुणधर्माचा स्वतःचा कळप स्वतःच तयार करणे हा एकमेव पर्याय आहे.
7) वेगवेगळ्या ठिकाणच्या पाठी गोळा करून एकत्र ठेवल्यास, लहानपणापासून एकत्र असल्याने मोठे झाल्यावर मारामारीचे प्रमाण कमी राहू शकते. नुकसान टळते.
8) पाठी वाढत असताना गोठा व चाऱ्याची व्यवस्था हळू हळू करता येऊ शकते. मोठ्या शेळ्यांच्या बाबतीत सुरवातीपासूनच या बाबी आवश्यक असतात. 
9) ज्या पाठी वेगाने वाढत नाहीत त्यांना वेळीच विकून टाकता येऊ शकते.
10) 4-5 महिन्याच्या पाठिमध्ये 3 महिन्याच्या पाठी मिसळणे टाळावे. मोठ्या पाठी लहान पाठींना मारतात व त्यांची उपासमार होते. त्यामुळे शक्यतो एकदाच पाठी खरेदी कराव्यात.
11) जातिवंत शेळ्याच्या पाठी सुद्धा विक्रीला येत असतात त्यामुळे चांगल्या अनुवांशिक गुणांच्या पाठी मिळू शकतात. विचार पूस करून खरेदी करणे योग्य राहील.
12) मोठ्या शेळ्यांना आवश्यक असलेली गव्हाण पाठींना योग्य होईल असे नाही, त्यामुळे सुरवातीला पाठींसाठी गव्हाणीची वेगळी सोय करावी लागेल.
13) पहिल्या व दुसऱ्या वेतात अनेक समस्या असतात याचा मी वर उल्लेख केला आहे. (मुद्दा क्रं 14). पाठी एका वेळेला विणार नाहीत हे पहिले पाहिजे. त्यामुळे एका पाठीचे करडू दुसऱ्या पाठीला पाजता येऊ शकते. खरे उत्पन्न सुरु व्हायला 2 ते 3 वर्ष लागतील ते यामुळेच.
14) पाठी भरविण्यासाठी आपण खात्रीचा बोकड सुरवातीपासून वापरू शकतो.
15) पहिल्या वितात करडे कमी वजनाची जन्माला येऊ शकतात. तसेच मरतुक जास्त होऊ शकते. त्यामुले पहिले व दुसरे वेत परवडणार नाही. याचाच अर्थ असा कि सुरवातीचे 2 ते 2.5 वर्ष कसलेही उत्पन्न मिळण्याची खात्री देता येणार नाही. तेवढा वेळ आपण धीर धरू शकलो पाहिजे.
16) पाठी खरेदी करताना चूक झाली तर अगदी सुरवातीलाच नुकसानीला सामोरे जावे लागेल.
17) पाठी पासून मिळालेल्या पाठी ठेवण्यासाठी आपणास किमान 3.5 वर्षाचा कालावधी जाऊ द्यावा लागेल. या कळवाधीत पाठीची अनुवांशिक चाचणी पूर्ण होईल असे गृहीत धरले आहे.
18) नैसर्गिक चोखंदळ पणा कमी होऊ शकतो. त्यामुळे चाऱ्याचा अपव्यय टाळता येऊ शकतो.


--- बाळू मोटे, बारामती (9422512680)
शेळ्यांची गव्हाण:-
१) शेळ्यांच्या गव्हाणी बाबत कोणते स्टॅण्डर्डस असावेत याची कुठे माहिती मिळत नाही. (कोणाला माहित असल्यास कृपया कळवावे)
२) एका शेळीला एका दिवसात आपण 3 वेळा चारा टाकत असू तर खालील प्रमाणे गव्हाणी असाव्यात असे माझे वैक्तिक मत आहे.
३) एका शेळीला एका दिवसात 5 किलो हिरवा चारा लागतो म्हणजे एका वेळेला आपण 5/3=1.67 किलो चारा टाकणार.
४) 1.67 किलो चारा मावण्यासाठी साधारण 0.33 घनफूट जागा लागेल. एका कॅरेट (1.65 घनफूट) मध्ये सुमारे 8 ते 9 किलो हिरवा चारा बसतो. तेंव्हा न दाबता 1.67 किलो चारा मावन्यासाठी आपण अंदाजे दुप्पट म्हणजे 0.66 घनफूट जागा गृहीत धरू. समजा 0.66 घनफूट जागा घेतली तर त्याच्या 20 टक्के (अंदाजे) जास्त ठेवल्यास चारा सांडणार नाही. म्हणजे सुमारे 0.80 घनफूट एवढी गव्हाण एका शेळीला लागेल.
५) स्थानिक जातीच्या शेळ्या मारक्या व आक्रमक असतात म्हणून एका शेळीला किमान रनिंग 2 फूट गव्हाण असायला हवी.
६) आता गव्हाणीची लांबी 2 फूट घेतल्यास रुंदी व खोली ठरवणे सोपे होईल. जर रुंदी 1 फूट गृहीत धरली तर खोली 0.4 फूट ठेवावी लागेल. म्हणजे साधारण 5 ते 6 इंच खोली ठेवावी लागेल.
७) 3 वेळा हिरवा चारा समप्रमाणात विभागून 10 शेळ्याना टाकवायचा असल्यास 20 फूट लांबीची, 1 फूट रुंदीची व अर्धा फूट खोलीची गव्हाण आवश्यक होईल.
८) गोठा बांधताना एका शेळीला रनिंग 2 फूट गव्हाण येईल हे पहिले पाहिजे.

टीप:- वरील माहिती अंदाजे व थेरोटीकल आहे. दिशा दर्शक म्हणून उपयोग होऊ शकतो. 

---बाळू मोटे, बारामती (9422512680)


लागवडीचा बोकड कसा निवडायचा (स्थानिक शेळ्यांसाठी)?:-


1) बोकड कसा दिसतो या वरून आपण बोकडाची निवड करतो. यात बोकडाची उंची, लांबी, छातीची रुंदी, दोन पायातील अंतर, चपळता व निवडलेल्या जातीचे सर्व गुण आहेत का हे पाहतो.
2) बोकडाची प्रोजेनी टेस्टिंग करून बोकड निवडला जाऊ शकतो. परंतु हे करण्यास आपल्याकडे तेवढा वेळ नसतो.
3) वंशावळीचे रेकॉर्ड बोकड निवडण्यासाठी उपयुक्त ठरते. या रेकॉर्ड चा बोकड निवडी साठी कसा उपयोग करायचा हे आपण पाहू.
4) प्रथम लागवडीच्या बोकडाची (A हे नाव देऊ) जन्मतः व 3 महिने वयाची वजने पहावीत. ती जास्तीत जास्त असणे आवश्यक आहे. त्यानंतर 6,9व 12 महिने वयाचा असतानाची वजने पहावीत. या चारही वजनात सलग चढ असावा, चढ उतार नसावा. बोकड जुळयातील असणे आवश्यक आहे.
5) आता बोकडाचा आईचे (B1चे) रेकॉर्ड चेक करावे. तिच्या सलग किमान 5 वेतातील करडांची संख्या पहावी, ती किमान 10 पर्यंत असावी. या 10 करडांची (जितकी असतील तितकी) जन्मतः व 3 महिने वयाची असतानाची वजने पहावीत. ती जास्तीत जास्त असावीत. B1 ची जन्मतः ,3,6,9,12 महिने वयाची वजने पहावीत. ती चढत्या वाढीने असावीत.
6) आता बोकडच्या बापाचे (A1) रेकॉर्ड चेक करावे. A1 चे जन्मतः, 3,6,9,12 महिने वयाची वजने पहावित. हि वजने चढत्या वाढीने असावीत. A1 ची वजने A च्या जन्मतः, 3,6,9,12 महिने वयाच्या वजनापेक्षा कमी नसावीत किंवा किमान तेवढी असावीत. A1 ने भरवलेल्या किमान 10 शेळ्यांचे रेकॉर्ड पहावे. त्यात त्या शेळ्यांपैकी किती शेळ्यांना जुळी करडे झाली, त्यांची जन्मतः व 3 महिने वयाची वजने पहावित. हि वजने A च्या त्यात्या वयाशी जुळवून पहावीत. यात A चे वजन इतरांपेक्षा जास्त असावे.
7) लागवडीचा बोकड जर जिवंत वजन रु 300 प्रति किलो दराने खरेदी करणार असाल तर किमान वर सांगितलेले (1 ते 6) मुद्दे प्रत्यक्ष तपासावेत.
8) जर लागवडीचा बोकड रु 300 पेक्षा जास्त दराने खरेदी करणार असाल तर खालील माहिती तपासावी. (तसे पाहू गेल्यास लागवडीचा बोकड निवडताना सर्व बारीक सारीक माहिती तपासणे हिताचेच असते, बोकडाची किंमतीवर कोणती माहिती चेक करावी हे अवलंबून नसते.)
9) बोकडाच्या A च्या बापाकडील व आईकडील आजोबा यांचे रेकॉर्ड मुद्दा क्रं 6 प्रमाणे चेक करावे.
10) बोकडाच्या A च्या आईकडील व बापाकडील आजीचे रेकॉर्ड मुद्दा क्रं 5 प्रमाणे चेक करावे.

टीप:- हि माहिती केवळ स्थानिक जातीच्या तसेच उस्मानाबादी, संगमनेरी इ जातींच्या शेळ्या पाळणार्या शेळी पालकांसाठी उपयोगी आहे. वरील माहिती कोणत्याही शास्त्रीय पद्धतीवर आधारित नसून माझी (बाळू मोटे) वैक्तिक विचार पद्धती आहे. कृपया याची नोंद घ्यावी.
---बाळू मोटे, बारामती (9422512680)

करडांची खुल्या बाजारात विक्री:-

१) शेळी पालन प्रकल्प सुरु करताना आपण शेळी पासून मिळणाऱ्या उत्पन्नाचा हिशोब केलेला असतो. त्यात आपण करडांची विक्री रु 200 प्रति किलो या दराने गृहीत धरतो.
२) पण प्रत्यक्ष बाजारात काय होते...!
३) तीन महिने वयाच्या करडाचे सरासरी वजन 13 किलो भरते असे मानल्यास आपणास 13x200= 2600 रु मिळायला हवेत. 
४) यात आपण शेळ्या खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांचा नफा गृहीत धरत नाही.
५) रु 2600 किमतेचे 13 किलो वजनाचे करडू खरेदी करून व्यापर्यास किती नफा होईल हे पहिले पाहिजे. 13 किलो जिवंत वजन असेल तर ते करडू कापल्यानंतर त्याच्या जिवंत वजनाच्या 50 ते 55 टक्के मटण मिळते. (कातडी, खूर- मुंडी इ पासून मिळणारे उत्पन्न वेगळे). म्हणजेच 13 च्या 50 टक्के म्हणजे 6.5 किलो मटण मिळेल. 6.5 x 400 रु = 2600 रु. 
६) म्हणजेच रु 200 दराने व्यापारी करडू खरेदी करणार नाही, कारण त्यात त्याचा कोणताही नफा नाही. 
7) व्यापारी करडू पाहून, त्याच्या कमरेवर हात टाकून त्याचे पासून अंदाजे किती मटण मिळेल हे बघतात. त्या हिशोबाने ज्या दरास त्यांना खरेदी करावयाचे आहे त्याच्या निम्म्या किमतीपासून बोली सुरु करतात. 
८) वरील उदाहरणात 13 किलो जिवंत वजन असलेले करडू ते रु 800 प्रति नग या दराने मागावयास सुरवात करतात.
9) बाजारात मालाची किती आवक आहे त्या हिशोबाने अंतिम दर ठरवला जातो.
१०) बाजारात जर जास्त माल आला असेल तर ते 13 किलोचे करडू रु 1700 ते रु 1800 या दरात खरेदी करतात. त्या पेक्षा जास्त दर मिळत नाही. म्हणजेच त्यांना 2600 -1800= 800 रु नफा एका करडपासून होईल.
११) जर बाजारात मालाची म्हणजेच करडांची व शेळ्यांची आवक कमी असेल तर ते 13 किलो वजनाचे करडू जास्तीत जास्त 2100 रु दराने खरेदी करू शकतात. म्हणजेच एका करडा पासून त्यांना 2600- 2100=500 रु नफा होऊ शकतो.
१२) तेंव्हा शेळी पालन प्रकल्प अहवाल तयार करताना या बाबींचा विचार होणे आवश्यक आहे.
१३) करडांची किंमत तजेलदार पणा, मांसाचे व चारबीचे प्रमाण या वर देखील अवलंबून असते.

टीप:- हा माझा वैक्तिक अनुभव आहे. मी चाकण, तळेगाव, बेल्हा, शिरूर लोणंद या ठिकाणच्या शेळी मेंढी बाजारात गेल्या 15 वर्षयांपासून कोकरांची व कारडांची विक्री करण्यास नेहमी जात असतो.

--- बाळू मोटे, बारामती (9422512680)

शेळी पालनातील काही चुकीची गृहीतके:-


१) शेळी पालनासंदर्भात अनेक ठिकाणी पुस्तकामध्ये, प्रशिक्षणात किंवा मौखिक; अनेक प्रकारचे सल्ले दिलेले आपणास पहावयास मिळतात. त्यातील कित्तेक शास्त्राला धरून किंवा प्रत्यक्ष उपयोगीतेचा विचार करून दिले जातात कोणास ठाऊक? त्यातील कांही खालील प्रमाणे-
२) बंदिस्त शेळी पालनात गोचीड नियंत्रणासाठी देशी कोंबड्या पाळण्याचा सल्ला दिला जातो. वास्तविक गोचीड शेळीच्या अश्या ठिकाणी कार्यरत असतो जेथे एकतर कोंबडी पोहचू शकत नाही किंवा शेळी तिला प्रतिकार करते. अशा वेळेला शेळीच्या अंगावरील गोचीड नियंत्रण कितपत शक्य होते? दुसरी बाब म्हणजे जमिनीतील गोचीड व अंडी यांच्या नियंत्रणासाठी कोंबडीचा उपयोग कितपत होतो? कारण गोचिडच्या सर्व अवस्था या शेळीच्या शरीरावर वाढत असतात. जे काही जिवंत गोचीड जमिनिवर पडतात तेव्हढ्या गोचिडांचे मात्र नियंत्रण होते. नाहीतर कोंबडी इतर वेळेला गव्हाणीतील चारा नासवते, फायद्या पेक्षा तोटा जास्त.
३) जे रवंथ करणारे पाळीव प्राणी आहेत त्यांच्या खाद्याच्या बाबतीत एक सर्व साधारण सल्ला असा आहे कि त्यांच्या आहारआत 70 टक्के एकदल वर्गीय व 30 टक्के द्विदल वर्गीय चारा असावा. परंतु शेळीच्या बाबतीत हे प्रमाण काही योग्य वाटत नाही.
४) शेळी निकृष्ट प्रतीच्या खाद्याचे किंवा चाऱ्याचे रूपांतर मांसात करते. पिष्टमय पदार्थ खाऊन प्रथिनांची व स्निग्ध पदार्थांची निर्मिती करते. असे सांगितले जाते. वास्तविक शेळीला निकृष्ट चारा उदा. बाजरीचे सरमड, गव्हाचे काड, उसाचे वाढे, ज्वारीचा कडबा, शेतातील पीक कापणीनंतर उरलेला पाला पाचोळा इ. मानवत नाही. हा चारा खाऊ घातल्यास शेळी सुधारत नाही. शेळीला चांगला, शेलका, स्वच्छ, प्रथिने युक्त चारा द्यावा लागतो. तरच शेळी सशक्त होते.
५) व्यावसायिक कुकूटपालनासाठी गोठ्याची लांबी पूर्व पश्चिम ठेवली जाते. हाच कित्ता शेळी पालनात गिरवला जातो. वास्तविक कोंबडी व शेळी यांचे मध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. शेळीच्या गोठ्याची लांबी उत्तर दक्षिण ठेवणे मला योग्य वाटते. 
६) कोरडवाहू भागासाठी शेळी पालन म्हणजे वरदान आहे असं सांगितलं जातं. वस्तुतः जेथे पाण्याची बारमाही सोय आहे अश्या ठिकाणीच व्यावसायिक बंदिस्त शेळी पालन केल्याचं जास्त दिसून येत. शेळ्यांना हिरवा चारा आवश्यक आहे, त्यामुळे शेतीला पाणी आवश्यक आहे. आणि म्हणून जेथे चार माही किंवा आठ माही बागायत आहे त्या ठिकाणी बंदिस्त शेळी पालन करताना फार अडचणी येतात. 
७) विकतचा चारा घालून शेळी पालन कसे काय परवडते कोणास ठाऊक? सोशल मीडियावर हरी पत्ती 15 रु किलो, तयार मुरघास 5 रु किलो तूर सोयाबीन भुसा वगैरे वगैरे असे दर आहेत. एवढं महाग खाऊ घालून फक्त ब्रीडिंग वाले शेळी पालकांना परवडत असावं...!
८) हैड्रोपोनिक मका चारा म्हणजे शेळ्यांसाठी जणू काही आधुनिक विज्ञानाची देणगीच आहे असं भास व्हावा इतकं उच्च प्रतीचं मार्केटिंग करतात लोकं. आर्थिक दृष्ट्या किती परवडतं हा निकष महत्वाचा आहे.

--- बाळू मोटे, बारामती (9422512680)



उस्मानाबादी व बोअर शेळी-

१) सोबत च्या चित्रात एका प्रथित यश बोअर शेळी पालकाने बोअर व उस्मानाबादी शेळीची तुलना केली आहे, हे pdf ऑनलाइन उपलब्ध आहे.
२) कोणत्याही दोन गोष्टींची तुलना करताना त्यांना एकाच वातावरणात म्हणजे एकसारखीच ट्रीटमेंट देऊन मग करायला हवी. पारंपरिक पद्धतीच्या उस्मानाबादी शेळी ची तुलना बंदिस्त बोअर शेळीशी केली तर चुकीचे ठरेल.
३) तुलना करताना उस्मानाबादी व बोअर शेळीला एकसारखेच खाद्य व खुराक देणे आवश्यक आहे, तेंव्हाच खरी तुलना होऊ शकते. बंदिस्त पद्धतीत उस्मानाबादी शेळीची किमान 3 ऱ्य 4थ्या पिढीनंतर तुलना करायला हवी. तसेच अनुवांशिक गुणधर्माच्या बाबतीत बोअर शेळी होमोजिनियस असते, तेंव्हा तुलना करण्यासाठी उच्च अनुवांशिक गुणधर्म असलेली उस्मानाबादी शेळ्यांचा कळप निवडायला हवा.
४) तुलना कमीत कमी दोन्ही शेळीच्या 5 वितांची करायला हवी.
५) सोबत च्या चित्रात फक्त वजन वाढीची तुलना केली आहे. 
६) जुळे देण्याचे प्रमाण, व एका शेळी पासून मिळणारे एकूण मांस उत्पादन, शेळी ची रोग प्रतिकार शक्ती, fcr, गाभडण्याची प्रमाण, करडांची मरतुक इ बाबी तुलना करण्यासाठी विचारात घेणे आवश्यक आहे.
७) आज रोजी जुळे देण्याच्या बाबतीत उस्मानाबादी शेळी बोअर पेक्षा व इतर भारतीय शेळी पेक्षा सर्वोत्तम आहे. जुळे मिळाले तरच शेळी पालन परवडते हा माझा अनुभव आहे.
८) बहुदा स्थानिक व उस्मानाबादी शेळ्या कश्या कमी प्रातिच्या आहेत व विदेशी शेळ्या कश्या उच्च प्रतीच्या आहेत असे दाखवून दिशा भूल केली जाते कि काय?
९) बोअर हि जगातील सर्वोत्तम मांसल व जास्त वेगाने वाढणारी शेळी आहे हे जगमान्य आहे, हे मी मान्य करतो. परंतु म्हणून भारतीय स्थानिक शेळ्या व उस्मानाबादी उत्पादनाच्या बाबतीत हलक्या ठरत नाहीत.

--- बाळू मोटे, बारामती. (9422512680)

हैड्रोपोनिक चारा म्हणजे मृगजळ...

माझा अनुभव...

साध्या हैड्रोपोनिक युनिट मध्ये 1 किलो गहू किंवा मका पासून 5 पट म्हणजे 5 किलो चारा तयार होतो. 8 किलो होत नाही. थंडी मध्ये 9 दिवसाच्या ऐवजी 15 दिवसापर्यंत देखील चारा समाधानकारक वाढत नाही. उन्हाळ्यात वाढतो परंतु त्यासाठी शेडनेट सह पत्र्याचे शेड आवश्यक असते.

1 किलो चे 5 किलो झाल्यानंतर त्यातील एकूण अन्न घटक तेवढेच राहतात, फक्त पचणीयतेचे प्रमाण वाढते. काही संयुक्त प्रथिने व शर्करा यांचे साध्या व पचायला सोप्या अश्या अमिनो आम्ले, संप्रेरके व जीवनसत्वे या मध्ये रूपांतरण होते. परंतु एकूण अन्न घटक तेवढेच राहतात.फक्त पाण्याचे वजन वाढते.

जर मका व गहू 20 रु किलोने मिळणार असेल आणि एका शेळीला समजा 5 किलो चारा टाकवायचा असेल तर रोजची 1 ते 1.5 किलो बी टाकावे लागेल. आणि तरीही हैड्रोपोनिक चारा हा मुख्य चार्यास पूरक चारा राहील. म्हणजे रोजचा खर्च 20 ते 25 रु अधिक मुख्य चार्यावरील खर्च असा राहील.

स्वयंचलित हैड्रोपोनिक युनिट मध्ये वजनात वाढ होऊ शकते परंतु विजेवरील खर्च वाढणार. (याचा मला अनुभव नाही)

जेंव्हा उन्हाळ्यात हिरव्या चाऱ्याची टंचाई असते अश्या वेळेला हैड्रोपोनिक चारा हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.

योग्य विचार करून निर्णय घ्यावा. महितीस्तव सादर...

--- बाळू मोटे, बारामती.