FAQ...11
शेळ्यांसाठी गोठा पूर्व -पश्चिम बांधावा की उत्तर-दक्षिण?
उत्तर:-
१) गोठ्याच्या लांबीची दिशा ठरवणे अत्यंत महत्वाचे आहे. आधुनिक कुकुटपालन मध्ये गोठ्याची लांबी पूर्व-पश्चिम ठेवली जाते व ते एक स्टॅंडर्ड आहे. परंतु हेच स्टॅंडर्ड शेळीच्या गोठ्यास लागू होईलच असे नाही.
२) गोठा बांधताना अनेक बाबींचा विचार करणे अपेक्षित आहे- ज्यात प्राथमिक बाबी म्हणजे गोठ्यात येणारे ऊन, वारा-हवा, पाऊस, सोसाट्याचा वारा व गारपीट या मुळे होणारे गोठ्याचे नुकसान, थंडी व थंड हवा. द्वितीय बाबी म्हणजे- गव्हांणीची रचना, कप्पे, फ्लोरिंग, ऐसपैस जागा. तृतीय बाबी म्हणजे- उपलब्ध क्षेत्र, व त्याचे लांबी कोणत्या दिशेला आहे ते, जमिनीचा प्रकार म्हणजे खोली, मातीचा प्रकार, गोठा कोणत्या भागात येतो म्हणजे शहरी, निमशहरी किंवा शेतात वैगरे.
३) गोठ्याच्या लांबी व रुंदीचा थेट संबंध हा शेळ्यांच्या आरोग्याशी आहे. महाराष्ट्रातील जो कमी पावसाच्या प्रदेश आहे त्या भागात गोठा हा उत्तर -दक्षिण लांबी असलेला बांधायला हवा. या मुद्यावर शेळ्यांचे आहारशास्त्र या व्हाट्स अप ग्रुप मध्ये अनेक वेळा शेळीपालकांची चर्चा झाली आहे. त्याचे फायदे तोटे यावर बारकाईने विचार झाला आहे.
४) लांबी उत्तर दक्षिण असल्यामुळे गोठ्यात भरपूर (हवा तेवढा) सूर्यप्रकाश आत घेता येतो. या सूर्यप्रकाशामुळे गोठ्याचे रोजच्या रोज निर्जंतुकीकरण होत असते, गोठ्यातील गोचीड, पिसवा, डास, माश्या यांचेवर नियंत्रण येते. सर्वात महत्वाचे म्हणजे गोठ्यातील ओलावा पूर्ण पणे कमी करता येतो. एरवी ओलावा कमी करण्यासाठी आपणास चुना वापरावा लागतो व त्यायोगे खर्च वाढतो.
५) पश्चिम महाराष्ट्र, खानदेश व मराठवाडा या प्रदेशात उत्तर दक्षिण लांबी असलेला गोठा उत्तम आहे. बाकी ज्या प्रदेशात जास्त पाऊस पडतो आशा ठिकाणी वेगळा विचार करावा लागतो.
६) पश्चिम बाजूने येणारा पाऊस व वारे आपणास त्या बाजूस भिंत बांधून रोखता येते. सर्वसामान्य पणे कमी पावसाच्या प्रदेशात याच बाजूने वारा व पाऊस हा येत असतो. पूर्वेची बाजू मोकळी ठेवल्यास सकाळ चे 12 वाजेपर्यंतचे ऊन गोठ्यात घेता येते. त्या योगे आपले बरेच प्रश्न आपोआप मार्गी लागतात.
७) हवा खेळती ठेवण्यासाठी व जास्तीत जास्त सूर्यप्रकाश आत येण्यासाठी गोठ्याची रुंदी 15 ते 20 फूट ठेवणे अपेक्षित आहे.
८) सोसाट्याचा वारा व गारपीट या मुळे गोठ्यास किती धोका आहे या हिशोबाने गोठ्याची उंची ठेवावी. जितकी उंची कमी ठेवाल त्या हिशोबाने गोठ्याची रुंदी देखील कमी ठेवावी व जितकी उंची वाढवाल त्या हिशोबाने रुंदी पण वाढवावी.
९) वरील प्रमाणे नियोजन केल्यास जवळपास सर्व समस्यांचे निराकरण करता येते.
- सौजन्य- शेळ्यांचे आहारशास्त्र ग्रुप, संकलन - बाळू मोटे, बारामती.