Friday, March 1, 2019


6


१) आमच्या कुटुंबाचा पारंपरिक व्यवसाय मेंढी व शेळी पालन हा आहे. माझ्या बहुतांश नातेवाईकांचा देखील मुख्य व्यवसाय हाच आहे. त्यातील काही लोकांनी मागील 10 वर्षात शेळ्या मेंढ्या विकून थोडीफार शेती खरेदी केली किंवा कर्ज काढून डोझर असलेले मोठे ट्रॅक्टर खरेदी करून कोकणात व्यवसायासाठी गेले. काही वर्षांपूर्वी या ट्रॅक्टर च्या व्यवसायात चांगले पैसे मिळत होते परंतु आता मात्र ट्रेकटर विकून मेंढर खरेदी करण्याचं प्रमाण लक्षणीय वाढलेलं आहे.
२) माझे नातेवाईक व सामाजातील बरीच लोकं माझा बंदिस्त शेळी पालन प्रकल्प पाहायला येतात व मला काही मोलाचे सल्ले देतात. आपण अडाणी समजतो अश्या लोकांनी मला सुरवातीला सांगितलं होत कि ' पहिले दीड -दोन वर्ष तुला अवघड जातील, एकदा का शेळ्यांनी रान घेतलं कि मग तू सुटलास'. जे जे अशिक्षित होते त्यांनी मला बंदिस्त शेळी पालन करण्यास विरोध केला नाही, परंतु जे शिकलेले आहेत व कोठे तरी नोकरी करतात अश्या बहुतांश जणांनी हा व्यवसाय बंद करून कोठेतरी नोकरी करण्याचा सल्ला दिला.
३) धनगर मेंडपाळांचे काही अनुभव मी येथे देत आहे-
:- 12 महिने फिरत्या मेंढ्या जर आपण घरी मूळ गावी ठेवल्या व मोकाट पद्धतीने जरी चारल्या तरी त्यांच्या 1 ते 2 वितात उत्पादनात घट येते.
:- फिरत्या मेंढ्याना व शेळ्यांना दररोज वेगवेगळ्या शेतात रात्री बसण्याची सवय असते. पावसाळ्यात अश्या शेतात मेंढरे बसवण्यास मर्यादा येतात, तेंव्हा अश्या वेळेस उंच ठिकाणी कायमचा 1 ते 4 महिण्याकरिता तळ ठोकतात, त्यास आम्ही मरड असे म्हणतो. जेंव्हा शेळ्या व मेंढ्या मरडीवर बसवतात त्या कालावधीत त्या खराब होतात व उत्पदनात थोडी घट येते.
:- फिरत्या मेंढ्याना काही गावातील चारा मानवतो तर काही गावातील मानवत नाही. ज्या गावातला चारा मानवत नाही
त्यास आम्ही 'बसक चांगली नाही' असे म्हणतो. ज्या गावाची बसक चांगली नाही त्या गावास गेल्यास दरवर्षी मेंढ्या खराब होतात असा अनुभव येतो. उलटपक्षी त्याच गावातील स्थायिक मेंढ्या व शेळ्या मात्र तब्यतीने चांगल्या दिसून येतात. याचाच अर्थ असा, कि ती बसक स्थानिक शेळ्या मेंढ्याना मानवत असते.
:- काही गावाचं वैशिष्ट्य असं आहे कि त्या गावात व परिसरात मेंढर गेली कि त्यांना विशिष्ट आजार उदा. माळीण होतो. माळीण महणजे नाकातून रक्त किंवा रक्त मिश्रित शेम्बुड येणे. परंतु स्थानिक जनावरांना हा त्रास होतोच असे नाही.
:- आमची मेंढरे पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील काही भागात वर्षभर फिरत असतात, त्यामुळे वेगवेगळ्या गावातील, परिसरातील वेगवेगळा अनुभव येत असतो.
४) अश्या प्रकारे स्थानिक शेळ्या व मेंढ्या विविध वातावरणास व वेगवेगळ्या भौगोलिक परिस्थितीस वेगवेगळा प्रतिसाद देतात.
५) व्हाट्स ऍप सारख्या माध्यमातून बंदिस्त शेळी पालनासाठी सिरोही, बिटल, सोजत, बार्बेरि वगैरे जातींची शिफारस व जाहिरात केली जाते. त्यात प्रामुख्याने असा दावा असतो कि उदा राजस्थानातील सिरोही हि शेळी तेथून आणून महाराष्ट्रातील वातावरणात एक महिना ठेऊन सेट केली जाते व आपल्याला विक्रीस उपलब्ध असते. 
असं कोणतं तंत्रज्ञान आहे कि ज्याचा वापर करताच कित्येक मैल अंतरावरील, विषम भौगोलिक व वातावरणातील सिरोही शेळी आपल्याकडे एका महिन्यात तीनही मोसमाकरिता सेट होते.
६) माझ्या मेंढरांतील माझ्या माहितीतल्या शेळ्या बंदिस्त केलंयानंतर सेट व्हायला मला किमान दीड वर्ष लागले. 
७) सिरोही शेळी किंवा इतर तत्सम देशी व विदेशी शेळ्या महाराष्ट्राच्या वातावरणात एका महिन्यात सेट होत असेल तर ते आक्रीतच म्हणावं लागेल. कोणी या विषयाचं प्रशिक्षण देत असेल तर कृपाय कळवावे.
८) शेळी हा समूह प्रिय प्राणी आहे, आणि त्याबाबतीत तो खूप संवेदनशील आहे. म्हणजे असं कि तुमचा समजा 20 शेळ्यांच बंदिस्त फार्म आहे आणि त्यात तुम्ही त्याच जातीची दुसऱ्या कळपातील शेळी आणून ठेवली तर तिला कित्येक महिने करमत नाही. तिची तब्येत सुधारत नाही. 
शेळी हा प्राणी समूहाप्रिय असून समूहात भांडणं करायला तिला आवडतं. त्या शक्यतो स्वतःच्या रक्ताच्या नात्यातील शेळ्यांसोबत राहायला, खेळायला, चरायला पसंत करतात.
९) असं असताना वेगवेगळ्या ठिकाणच्या शेळ्या गोळा करून त्या आपल्याला महागड्या किमतीने दिल्या जातात, आणि आपणही त्या घेतो. त्यांनी एकत्र कसं राहावं, कसं खावं, प्यावं, खेळावं.
एका महिन्यात कसं सेट व्हावं...!

balu mote

No comments:

Post a Comment