Friday, March 1, 2019


6


१) आमच्या कुटुंबाचा पारंपरिक व्यवसाय मेंढी व शेळी पालन हा आहे. माझ्या बहुतांश नातेवाईकांचा देखील मुख्य व्यवसाय हाच आहे. त्यातील काही लोकांनी मागील 10 वर्षात शेळ्या मेंढ्या विकून थोडीफार शेती खरेदी केली किंवा कर्ज काढून डोझर असलेले मोठे ट्रॅक्टर खरेदी करून कोकणात व्यवसायासाठी गेले. काही वर्षांपूर्वी या ट्रॅक्टर च्या व्यवसायात चांगले पैसे मिळत होते परंतु आता मात्र ट्रेकटर विकून मेंढर खरेदी करण्याचं प्रमाण लक्षणीय वाढलेलं आहे.
२) माझे नातेवाईक व सामाजातील बरीच लोकं माझा बंदिस्त शेळी पालन प्रकल्प पाहायला येतात व मला काही मोलाचे सल्ले देतात. आपण अडाणी समजतो अश्या लोकांनी मला सुरवातीला सांगितलं होत कि ' पहिले दीड -दोन वर्ष तुला अवघड जातील, एकदा का शेळ्यांनी रान घेतलं कि मग तू सुटलास'. जे जे अशिक्षित होते त्यांनी मला बंदिस्त शेळी पालन करण्यास विरोध केला नाही, परंतु जे शिकलेले आहेत व कोठे तरी नोकरी करतात अश्या बहुतांश जणांनी हा व्यवसाय बंद करून कोठेतरी नोकरी करण्याचा सल्ला दिला.
३) धनगर मेंडपाळांचे काही अनुभव मी येथे देत आहे-
:- 12 महिने फिरत्या मेंढ्या जर आपण घरी मूळ गावी ठेवल्या व मोकाट पद्धतीने जरी चारल्या तरी त्यांच्या 1 ते 2 वितात उत्पादनात घट येते.
:- फिरत्या मेंढ्याना व शेळ्यांना दररोज वेगवेगळ्या शेतात रात्री बसण्याची सवय असते. पावसाळ्यात अश्या शेतात मेंढरे बसवण्यास मर्यादा येतात, तेंव्हा अश्या वेळेस उंच ठिकाणी कायमचा 1 ते 4 महिण्याकरिता तळ ठोकतात, त्यास आम्ही मरड असे म्हणतो. जेंव्हा शेळ्या व मेंढ्या मरडीवर बसवतात त्या कालावधीत त्या खराब होतात व उत्पदनात थोडी घट येते.
:- फिरत्या मेंढ्याना काही गावातील चारा मानवतो तर काही गावातील मानवत नाही. ज्या गावातला चारा मानवत नाही
त्यास आम्ही 'बसक चांगली नाही' असे म्हणतो. ज्या गावाची बसक चांगली नाही त्या गावास गेल्यास दरवर्षी मेंढ्या खराब होतात असा अनुभव येतो. उलटपक्षी त्याच गावातील स्थायिक मेंढ्या व शेळ्या मात्र तब्यतीने चांगल्या दिसून येतात. याचाच अर्थ असा, कि ती बसक स्थानिक शेळ्या मेंढ्याना मानवत असते.
:- काही गावाचं वैशिष्ट्य असं आहे कि त्या गावात व परिसरात मेंढर गेली कि त्यांना विशिष्ट आजार उदा. माळीण होतो. माळीण महणजे नाकातून रक्त किंवा रक्त मिश्रित शेम्बुड येणे. परंतु स्थानिक जनावरांना हा त्रास होतोच असे नाही.
:- आमची मेंढरे पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील काही भागात वर्षभर फिरत असतात, त्यामुळे वेगवेगळ्या गावातील, परिसरातील वेगवेगळा अनुभव येत असतो.
४) अश्या प्रकारे स्थानिक शेळ्या व मेंढ्या विविध वातावरणास व वेगवेगळ्या भौगोलिक परिस्थितीस वेगवेगळा प्रतिसाद देतात.
५) व्हाट्स ऍप सारख्या माध्यमातून बंदिस्त शेळी पालनासाठी सिरोही, बिटल, सोजत, बार्बेरि वगैरे जातींची शिफारस व जाहिरात केली जाते. त्यात प्रामुख्याने असा दावा असतो कि उदा राजस्थानातील सिरोही हि शेळी तेथून आणून महाराष्ट्रातील वातावरणात एक महिना ठेऊन सेट केली जाते व आपल्याला विक्रीस उपलब्ध असते. 
असं कोणतं तंत्रज्ञान आहे कि ज्याचा वापर करताच कित्येक मैल अंतरावरील, विषम भौगोलिक व वातावरणातील सिरोही शेळी आपल्याकडे एका महिन्यात तीनही मोसमाकरिता सेट होते.
६) माझ्या मेंढरांतील माझ्या माहितीतल्या शेळ्या बंदिस्त केलंयानंतर सेट व्हायला मला किमान दीड वर्ष लागले. 
७) सिरोही शेळी किंवा इतर तत्सम देशी व विदेशी शेळ्या महाराष्ट्राच्या वातावरणात एका महिन्यात सेट होत असेल तर ते आक्रीतच म्हणावं लागेल. कोणी या विषयाचं प्रशिक्षण देत असेल तर कृपाय कळवावे.
८) शेळी हा समूह प्रिय प्राणी आहे, आणि त्याबाबतीत तो खूप संवेदनशील आहे. म्हणजे असं कि तुमचा समजा 20 शेळ्यांच बंदिस्त फार्म आहे आणि त्यात तुम्ही त्याच जातीची दुसऱ्या कळपातील शेळी आणून ठेवली तर तिला कित्येक महिने करमत नाही. तिची तब्येत सुधारत नाही. 
शेळी हा प्राणी समूहाप्रिय असून समूहात भांडणं करायला तिला आवडतं. त्या शक्यतो स्वतःच्या रक्ताच्या नात्यातील शेळ्यांसोबत राहायला, खेळायला, चरायला पसंत करतात.
९) असं असताना वेगवेगळ्या ठिकाणच्या शेळ्या गोळा करून त्या आपल्याला महागड्या किमतीने दिल्या जातात, आणि आपणही त्या घेतो. त्यांनी एकत्र कसं राहावं, कसं खावं, प्यावं, खेळावं.
एका महिन्यात कसं सेट व्हावं...!

balu mote

5


१) स्मॉल रूमीनंट म्हणजे शेळी मेंढी इ सारखे प्राणी जे रवंथ करतात. यांची पचनसंस्था कशी काम करते हे समजून घेणे खरोखरच हितावह आहे. 4 कप्या पैकी पहिला कप्पा म्हणजे रुमेन. यात असंख्य बॅक्टेरिया, प्रोटोझोवा व फंगस असतात. तुलनेने बॅक्टेरियांची म्हणजे जिवाणूंची संख्या जास्त असते. जिवाणू द्वारे अन्नाचे पचन येथे चालू असते.
२) येथील जिवाणू व काही अन्नाचा भाग पुढच्या कप्प्यात जाऊन वेगवेगळ्या विकाराद्वारे पचवले जातात. याचा अर्थ असा कि रवंथ करणारे प्राणी स्वतःच्या पोटात वाढवलेले जिवाणू खातात, म्हणजेच हे प्राणी मांसाहारी आहेत..!
३) शेळीच्या शरीर वाढीसाठी वनस्पती जन्य प्रथिनांची आवश्यकता असते, ते आपण द्विदल वर्गीय चारा, मका, गहू व खुरकातून देतो. या सर्व वनस्पती जन्य प्रथिनांचं जीवनुमार्फत विघटन केलं जातं व पुढे ते पचवलं जातं.
४) प्रथिनांमध्ये एक महत्वाचा घटक असतो तो म्हणजे नायट्रोजेन N. हा नायट्रोजेन युरिया मधून शेळीला पुरवता येतो तेंव्हा त्याला नॉन प्रोटीन नायट्रोजेन NPN असे म्हणतात.
५) निकृष्ट दर्जाच्या चार्यामध्ये उदा गव्हाचे काड, सरमड, भाताचा पेंढा वगैरे. या मध्ये वनस्पती जन्य प्रथिने फार कमी असतात. त्यात नायट्रोजेन चे प्रमाण कार्बनच्या तुलनेत फारच कमी असते. परिणामी जीवणूद्वारे असे पदार्थ पचावण्यास उशीर लागतो. किंवा ते पचत नाहीत. परंतु अश्या पदार्थांची ऊर्जा पुरवण्याची क्षमता जास्त असते, परंतु प्रथिनांच्या अभावी त्याचा उपयोग होण्यात अडचणी येतात. शास्त्रीय भाषेत सांगायचं झाल्यास गव्हाचे काड व उसाचे पाचट यांचा कर्ब:नत्र गुणोत्तर 110:1 च्या आसपास आहे. याचा अर्थ असा कि कार्बनचे 110 अनु तेंव्हा नायट्रोजन चा 1 अनु. कर्ब:नत्र गुणोत्तर जर 10:1 असे असेल तर असे पदार्थ जिवाणू मार्फत लवकर कुजवले किंवा पचवले जाऊ शकतात.
६) गव्हाच्या काडावर युरियाची प्रक्रिया करून त्यातील नत्राचे प्रमाण कृत्रिम रित्या वाढविता येते परिणामी असा निकृष्ट चारा लवकर पचतो व त्यातील व जीवणूद्वारे प्रथिनांची निर्मिती होते.
७) युरियाची प्रक्रिया केलेला चारा शेळीनं खल्यांनातर तिच्या पोटातील जिवाणू युरियातील नत्राचा उपयोग स्वतःच्या शरीरासाठी आवश्यक प्रथिने निर्मितीसाठी करतात. जसं मातीमध्ये आजटोबॅक्टर, रायझोबियम हवेतील नत्र व जमिनीतील सेंद्रिय पदार्थ घेऊन, ते मेल्यानंतर जमिनीत नत्र स्थिरीकरण करतात तसे पोटातील जिवाणू युरियातील नायट्रोजन चा उपयोग प्रथिने निर्मितीसाठी करतात. असे जिवाणू पुढच्या आतड्यात जाऊन पचवले जातात. अश्या तर्हेने शेळीला NPN द्वारे प्रथिने मिळतात व निकृष्ट चारा देऊनही शेळ्यांची तब्येत चांगली राहते.
८) गेल्या वर्षी चारा टंचाईमुळे मी करडांसाठी युरिया वापरायचे ठरवले. परंतु चार्यावर प्रक्रिया न करता सोप्यात सोपी पद्धत वापरायचे ठरविले. या साठी मी पिण्याच्या पाण्यात युरिया विरघळवून ते पाणी पिण्यास ठेवले.
९) ८ कर्डांचा विचार करून द्रावण तयार केले होते परंतु 8 पैकी फक्त 3 कर्डानीच ते पाणी पिले.
१०) परिणामी त्यांना युरियाची विषबाधा होऊन ती तीनही करडे अर्ध्या तासाच्या आत मृत्युमुखी पडली.
११) आता या सर्व प्रकारास तुम्ही मला वेडे ठरवाल, पण माझ्याकडून ती चूक झाली हे खरेच. माझं एवढंच सांगण आहे कि माझ्यासारखा अघोरी प्रयोग कोणी करू नये.
१२) युरियाचं पाणी पिल्यानंतर 5-10 मिनिटात करडांचे अंग थरथर कापायला लागले, त्यांना उठता येईना, बसता येईना, श्वास घेता येईना. थोड्या वेळाने तोंडाला फेस सुटला. सुमारे अर्ध्या तासात उपचार चालू असताना तीनही करडे मरून पडली. माझ्या डोळ्यादेखत मेली. जनावरांचे डाक्टर देखील होते. पोट फुगले होते, बहुदा गॅस तयार झाला असावा.
१३) युरिया पाण्यात टाकल्यानंतर किंवा जनावराने युरिया खाल्ल्यानंतर तो पोटातील पाण्यात मिसळतो व त्यातून अमोनिया गॅस तयार होतो. या प्रक्रियेस युरियाचं हैड्रोलिसिस असे म्हणतात. हा अमोनिया गॅस अतड्याद्वारे रक्तात शोषला जातो. इथेच तर खरी अडचण असते. एकदा रक्तात अमोनिया गेला कि विषबाधा होते.
१४) किती प्रमाणात विषबाधा झाली या वर पुढचा सर्व खेळ अवलंबून असतो. पण जनावर वाचण्याची शक्यता फार कमी असते.
१५) पोटातील अमोनियला थांबवण्यासाठी असेटिक ऍसिड किंवा त्याला व्हिनेगर म्हणतात ते पाजयचे असते. पण आपल्या गावात ते मिळत नाही. दुसरा उपाय म्हणजे सलाईन लावायची व रक्त डायलूट करायचं. इतर विषबाधेवर चालणारं ऍट्रोपीन सल्फेट इथे उपयोगाला येत नाही.
१६) असो. माझं किमान 12 हजाराचे नुकसान झाले. प्रयोग खूपच महागात पडला.

Balu Mote, Baramati.
4

१) चारा आणि खुराक यांचं नियोजन अतिशय महत्वाचे आहे. बऱ्याच वेळा पोटभर चारा देऊन, खुराक देऊन देखील शेळ्यांची वजने वाढत नाहीत अशी तक्रार असते. माझ्या 2 वर्षाच्या अनुभवाच्या कालावधीत मला हि समस्या प्रकर्षाने जाणवली. त्यासंबंधी मी माझे चिंतन येथे मांडणार आहे. मी कोणताही निष्कर्ष येथे मांडणार नाही, किंबहुना हे विचार वाचकांनी लक्षात घ्यावेत व पुढील प्रयोग करून योग्य ते निःकर्ष काढावेत हि विनंती
२) प्रशिक्षणे, चर्चा सत्रे, पुस्तके या मध्ये शेळी च्या वजनाच्या 2 टक्के एवढा DM म्हणजे dry matter म्हणजेच शुष्क भाग देण्यास सांगितले जाते. जर या प्रमाणे 4 किलो ओला चारा व 1 किलो सुका चारा दिला तर हि 2 टक्के DM ची गरज पूर्ण होऊ शकते.
३) शेळीच्या वजन वाढीसाठी वेगवेगळ्या अन्नघटकांची वेगवेगळ्या प्रमाणात गरज असते. आपण येथे फक्त प्रथिने म्हणजेच प्रोटीन याचाच फक्त विचार करणार आहोत.
४) सोबतच्या चित्रात शेळीच्या वेगवेगळ्या अवस्थेत किती DM लागतो व त्यावर आधारित किती क्रूड प्रोटीन CP लागतो हे दिसते. हि माहिती बाहेरील देशातील असून आपल्याकडील शेळ्यांना जशीच्या तशी लागू होईल असे नाही. उदाहरण दाखल येथे घेतली आहे. या माहितीत DM ची व CP ची रेंज दाखवली आहे, त्याचे खालील 2 अर्थ निघू शकतात-
– त्या देशातील शेळीच्या वेगवेगळ्या जातींसाठी ती रेंज असू शकते.
– किंवा एकाच शेळीच्या जातीसाठी कमीत कमी व जास्तीत जास्त अशी रेंज असू शकते.
आपण येथे दुसरा मुद्दा विचारात घेणार आहोत, म्हणजेच दिलेली रेंज हि एकाच जातीच्या शेळी साठी कमीत कमी व जास्तीत जास्त असे मानू.
५) आजचे विवेचन हे पुढील वाक्य केंद्रीभूत ठेवून करणार आहे-
' शरीर वाढी साठी जे अन्नघटक जितक्या कमी प्रमाणात लागतात तितकेच ते त्यांच्या थोड्याश्या कमी जास्त प्रमाणामुळे शरीर वाढीवर विपरीत परिणाम करू शकतात'.
६) वरील स्टेटमेंट समजून घेण्याकरिता आपण एक हायपोथेटिकल उदाहरण पाहू-
समज एक व्यक्ती 3 चपात्या व वाटीभर भाजी असे 250 ग्राम चे जेवण जेवते. या 250 ग्राम जेवणात 1 ग्राम मीठ आहे. जेंव्हा 250 ग्राम जेवनामध्यए 1 ग्राम मीठ असते तेंव्हा जेवण चविष्ट असल्याने ती व्यक्ती ते जेवण आवडीने खाते. आता 1 ग्राम मिठाएवजी 0.750 ग्राम मीठ टाकू तेंव्हा तेच जेवण त्याच व्यक्तीला किंचित अळणी लागेल परंतु तो ते पूर्ण खाऊन टाकेल. हि झाली सहनशक्ती. आता त्याच जेवणात 0.500 ग्राम एवढेच मीठ टाकू. आता त्या व्यक्तीला तेच जेवण अळणी व बेचव लागेल म्हणून तो 3 चपात्यापैकी 2 नच खाईल. हि झाली कमतरता. आता आपण त्या जेवणात 0.250 ग्राम मीठ टाकू, या वेळेला ती व्यक्ती फक्त 1च चपाती खाऊ शकतो.
आपणास या उदाहरणात काय दिसते. 250 ग्राम जेवणात अतिशय कमी प्रामनात लागणाऱ्या मिठाच्या मात्रेत थोडा जरी बदल केला तरी त्याचे परिणाम मोठे दिसतात. आता हेच उदाहरण आपणास शेळी ला लागणाऱ्या प्रथिनांचा मात्रेबाबत अकडेवारींनीशी तपासून पाहायचे आहे.
७) सोबतच्या चित्रात विलेल्या व दूध देणाऱ्या (lactation) शेळीला तिच्या वजनाच्या 2.8 ते 4.6 टक्के एवढा DM तर त्या DM च्या 12 ते 17 टक्के CP लागेल असे मांडले आहे. यात 2.8 हि कमीत कमी तर 4.6 हि जास्तीत जास्त पातळी तसेच 12 व 17 हि कमीत कमी व जास्तीत जास्त पातळी अनुक्रमे DM व CP यांचे बाबतीत आहे असे मानू.
८) एक 40 किलो वजनाच्या शेळीला वरील आकडेवारी नुसार किती DM व CP लागेल ते काढू.
- (40X2.8)/100= 1.12 kg DM लागेल य DM मध्ये पुढील प्रमाणे CP असायला हवा
:(1.12X12)/100= 0.1344 kg CP. येथे 1.12 व 0.1344 हि DM ची व CP ची कमीत कमी गरज आहे हे लक्षात घावे.
-(40X4.6)/100= 1.84kg DM लागेल यात
:(1.84X17)/100=0.3128 kg CP असायला हवा. येथे 1.84 व 0.3128 हि अनुक्रमे DM व CP ची जास्तीत जास्त गरज आहे हे लक्षात घ्यावे.
९) वरील प्रमाणे शेळीच्या चांगल्या पोषणासाठी तिला जास्तीत जास्त 0.3128 kg प्रथिने (CP) किंवा व्यवस्थित वाढीसाठी किमान 0.1344kg प्रथिनांची आवश्यकता आहे. या पेक्षा कमी प्रथिने म्हणजेच CP मिळाले तर शेळीच्या उत्पादनावर व वजन वाढीवर परिणाम होईल. येथे आपण कमीत कमी पातळी विचारात घेऊ.
१०) आपण शेळीला फक्त ओला हिरवा मका व खुराक देत आहोत असे गृहीत धरू. मका चर्या बाबत खालील विधाने गृहीत धरू. (संदर्भासाठी मेज एक्सपर्ट सिस्टीम नावाच्या वेबसाईटवरुन हि माहिती घेतली आहे)
-मका दाण्यात 12 टक्के प्रोटीन असतात
- बी पेरल्यानंतर त्याला कणसे लागेपर्यंत 7 ते 10 टक्के प्रोटीन असते. व 85 ते 90 टक्के पाणी असते.
- चिकातील मका चाऱ्यात पुन्हा 12 टक्के प्रोटीन व 80 टक्के पाणी असते
- बी पक्व झाल्यावर प्रोटीन 12 टक्क्यांवरून कमी कमी होत जाऊन 8 टक्के पर्यंत खाली येते. पाणी 75 ते 70 टक्के एवढे असते.
-अश्या वेळेला मात्र फक्त दाणे काढून प्रोटीन काढल्यास ते 10 ते 12 टक्के भरते.

खुराक म्हणून आपण गोळी पेंड देणार आहोत ज्या मध्ये 22 टक्के प्रोटीन आहे.
११) 40 किलो वजनाच्या शेळीला 1.12 कलो DM लागतो हे आपण पहिले. तेवढा Dm देण्यासाठी किती मका व खुराक द्यावा लागेल व त्यात किती प्रोटीन मिळेल ते काढू. 
- 5 किलो चिकातील मका चाऱ्यात
(5x80)/100=4, 5-4=1kg. म्हणजेच 5किलो हिरवा चिकातील चाऱ्यात 1 किलो DM आहे.
- (1x12)/100= 0.12 kg CP मिळेल
- 0.150 kg गोळी पेंड दिल्यास
(0.150x10)/100=0.015, 0.150-0.015=0.135 kg DM मिळेल.(10% ओलावा)
- (0.135x22)/100= 0.0297 kg CP मिळेल
आता आपण वरील दोघांची DM व CP ची बेरीज करू-
DM=1+0.135=1.135kg
CP=0.12+0.0297=0.1497kg
40 केली वजनाच्या शेळीला जेवढा DM व CP लागतो त्यापेक्षा थोडा जास्त वरील आहारातून दिला जात आहे हे येथे लक्षात घ्यावे.
१२) दर वेळेला आपणास चिकात आलेली मकेचा हिरवा चारा म्हणून देणं शक्य होत नाही. बऱ्याच वेळेला आपण कणसे लागण्या अगोदर किंवा पक्व मका चारा म्हणून खाऊ घालतो. आता जर कणसे लागण्या अगोदर मका खाऊ घातल्यास म्हणजेच 85 टक्के पाणी व 9 टक्के CP असताना 5 किलो खाऊ घातल्यास त्याच शेळीला किती DM व CP मिळेल ते पाहू. येथे आपण खुरकामध्ये कोणताही बदल करणार नाही आहोत-
-(5X85)/100= 4.25, 5-4.25= 0.75 kg DM.
- (0.75x9)/100=0.0675 kg CP
आता
एकूण DM= 0.75+0.135=0.885 kg व
CP= 0.0675+0.0297= 0.0972
म्हणजेच जर आपण चार्यातील केवळ 5 टक्के पाण्याचं प्रमाण वाढवलं व प्रोटीन केवळ 3 टक्केनी कमी केलं तर त्या शेळीला
DM-0.235 kg व CP- 0.0372 kg एवढ तिला लागणाऱ्या DM च्या व CP च्या कामीत कमी पातळी पेक्षा कमी मिळेल.
१३) एकूणच शेळीच्या आहारातील अन्नघटक मोजून शेळीला खाद्य पुरवठा करणे सध्या तरी आपल्याकडे शक्य नाही. मग अश्या परिस्थितीत शेळीचे चांगले पोषण होईल असा आहार देण्याची कोणती सोपी पद्धत आहे?
१४) हे विश्लेषण पूर्णपणे थेरोटीकल आहे. हेच प्रॅक्टीकॅली करता येऊ शकणार नाही. केवळ मका चारा म्हणून घेतला आहे तो केवळ गणितातील किचकट पणा टाळण्यासाठी. वास्तविक संतुलित आहार देऊन सुद्धा असे गणित मांडता येईल.






3


१) व्यवसायात तोटा होण्याची अनेक करणे आहेत. त्यापैकी करडांचे मरतुक हे प्रमुख कारण आहे.
२) दोन वर्षात 3 विते न मिळणे हे दुसरे प्रमुख कारण आहे
३) शेळ्यांची व करडांची वजन वाढ व्यवस्थित न होणे हे आणखी एक महत्वाचे कारण आहे. गेली 2 वर्षे दुष्काळ असल्याने व चांगल्या चाऱ्याची उपलब्धता व कमी खुराक या कारणाने वजन वाढ हवी तशी मिळाली नाही. माझा नाविलाज होता.
४) 2 वर्षातील एकूण 41 विते मिळाली. त्यापैकी
- जुळे करडे 42
- एक करडू 18
- तिळे करडे 9
एकूण करडे- 69
पहिल्या तीन महिन्यात झालेली एकूण मरतुक-28
एकूण विक्री योग्य करडे 41
५) 2 वर्षात
- 4 वेळा विलेल्या शेळ्या- 1
- 3 वेळा विलेल्या शेळ्या-2
- 2 वेळा विलेल्या शेळ्या- 13
- 1 वेळ विलेल्या शेळ्या-5
- 0 वेळा विलेल्या शेळ्या-3
६) व्यावस्थापणातील त्रुटी तर कारणीभूत आहेतच परंतु फिरत्या शेळ्या एकदम बंदिस्त केल्यामुळे त्यांच्यावर जो ताण आला त्यामुळे करडांची मरतुक झाली तसेच 2 वर्षात 3 वेत मिळाले नाहीत अस म्हणायला मोठा वाव आहे.


Balu Mote, Baramati. 9422512680


2


१) 13 जून 15 रोजी मी आमच्या मेंढरातून 22 शेळ्या 3 पाठी अकोले तालुक्यातील पाडाळने या गावातून बारामती येथे आणल्या. यात एक बोकड होता.
२) 2015 साली अंदाजे साधारण 350- 400 mm एवढा पाऊस तर 2016 मी मॅन्युअल रेन गेज शेतावर बसवले व या वर्षी पाऊस 520 mm झाला. यातील एफ्फेक्टिव्ह रेनफॉल जर काढला तर हि दोन्ही वर्ष स्थानिक लोकेशनला भयंकर दुष्काळाची गेली.
३) 22 शेळ्यांपैकी 8 शेळ्या विकल्या, 3 शेळ्या एक बोकड व 3 मोठी करडे वेगवेगळ्या कारणाने मेली, जी सर्व विक्रीयोग्य होती.
४) सध्या 2 बोकड व 18 शेळ्या आहेत. तसेच 13 मोठी विक्री योग्य करडे आहेत.
५) 2 वर्षातील खर्च खालील प्रमाणे
- स्वतःच्या शेतातील चारा रु 56690.
- विकतचा चारा रु 30890.
- खुराक रु 42090.
- औषधे रु 17772.
-मजुरी 150X730 दिवस एकूण रु 109500.
- सध्या भांडवली खर्च यात धरत नाही.
६) 2 वर्षातील उत्पन्न खालील प्रमाणे
- लोकल मार्केट मध्ये करडे व बोकड विक्री रु 35400.
- मोठ्या शेळ्यांची विक्री रु 34000.
- लेंडी खत रु 30000
- सध्या विक्री योग्य माल रु 58050.
- विक्री योग्य मरतुक रु 35500. हि हिशोबात धरली नाही.
७) एकूण खर्च रु 256945.
एकूण उत्पन्न रु 157450.
एकूण तोटा रु 99495.
८) माझ्या दृष्टीने 2 वर्षात दुष्काळात हा व्यवसाय टिकवता आला हे समाधान आहे.
९) पहिल्या वर्षी कारडांची मरतुक झाली. दुसरं वेत मिळालं नाही. शेळ्यांची तब्येत फारच खालावली होती. या सर्वाचा परिणाम म्हणून तोटा झाला असं मी मानतो.
१०) सध्या शेळ्या चांगल्या आहेत. आणि येथून पुढे दुष्काळ पडला नाही तर तोटा होणार नाही व चांगले उत्पन्न मिळेल असे वाटत आहे.
११) मेंढरांतील फिरत्या शेळ्या असल्याने त्यांना बंदिस्त वातावरण सूट व्हायला सुमारे दीड वर्ष लागले अस मी मानतो.

Balu Mote, Baramati. 9422512680